हिंगोली : महाराष्टÑ शासनाच्या कृषी व पणन विभाग आणि आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे १३ व १४ मे रोजी धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथील महावीर भवनात हा महोत्सव आयोजित केला असून, उत्पादक ते ग्राहक असा थेट संबंध निर्माण करण्याच्या हेतूने या महोत्सवाचा उपक्रम हाती घेण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात विविध प्रकारचे धान्य व फळे तयार होतात. पारंपरिक पद्धतीने होणार्या शेतीमाल विक्रीत दलालांची मोठी साखळी कार्यरत असते. त्यामुळे या व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी शेतकरी, उत्पादक आणि ग्राहक यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण होण्याच्या हेतूने सदर धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात अनेक प्रकारचे धान्यांचे जसे गहू, हरभरा, तूर, उडीद, मूग, जवस, कारले इत्यादी मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. त्यामध्ये विविध प्रकाराच्या वाणांची लागवड होते. याशिवाय हरभरा, तूर, उडीद, मूग यांच्या डाळीही शेतकरी गटाद्वारे उत्पादित केल्या जातात. तसेच कृषी मालाचे मूल्यवर्धित पदार्थ जसे हळद पावडर, मसाले, पापड, लोंची इत्यादी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादित करण्यात येत आहेत. या सर्व घटकांना शहरी ग्राहकांशी थेट संपर्क करण्याची संधी यानिमित्ताने शेतकरी उत्पादकाला मिळणार आहे. या धान्य व फळे महोत्सवात भाग घेऊ इच्छिणार्या शेतकरी गटाने आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करणे आवश्यक आहे. महोत्सवास ग्राहकांनीही भेट देऊन तसेच धान्याची खरेदी करून उत्पादकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हिंगोली येथे होणार्या महोत्सवात नागरिकांनी भेट देवून शेतकर्यांकडून धान्य खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. पवार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक पी.के. उगले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
दोन दिवसीय धान्य महोत्सव
By admin | Updated: May 11, 2014 00:38 IST