लातूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो. मात्र दुष्काळामुळे यंदा अनेकांचा सोने खरेदीचा मुहूर्त हुकला आहे. सोमवारी सोने खरेदीची उलाढाल चक्क ८० टक्क्यांनी घसरली. लातूरच्या सराफा बाजारातील सोने खरेदीची आर्थिक उलाढाल निव्वळ दीड कोटीपर्यंत आली आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार विजयादशमी, गुढी पाडवा, दिवाळी आणि अक्षय तृतीयेनिमित्त सोने खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. सोमवारी अक्षय तृतीयेनिमित्त लातूर शहरातील सराफा बाजारात सोने खरेदीसाठी अपेक्षित गर्दी झाली नसल्याचे, सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यंदा लग्नसराईचा मौसम आहे. तरीही दुष्काळामुळे सोने खरेदीला प्रतिसाद मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. सराफांच्या तब्बल ४४ दिवसांच्या संपानंतरही अद्यापही म्हणावा तसा सराफा बाजार फुलला नाही. शहरातील सराफा बाजारात तब्बल ३५० च्या वर सराफा दुकाने आहेत. या माध्यमातून १ हजार कारागिरांच्या हाताला काम मिळते. मात्र, दुष्काळामुळे सोमवारी अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतानाही ग्राहकांची गर्दी झाली नाही. केवळ १ कोटी ५० लाखांच्या घरात सोने खरेदीची उलाढाल झाल्याचे, लातूर जिल्हा सराफ-सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष मोहन जाधव रामेगावकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१० कोटींवर होती उलाढाल...गेल्या चार वर्षापूर्वी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीची आर्थिक उलाढाल १० कोटींच्या घरात गेल्याची नोंद आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून सततच्या नापिकी आणि दुष्काळामुळे यंदा हीच खरेदी चक्क ८० टक्क्यांवर घसरली आहे. सोने खरेदीची २०१४ मध्ये १० कोटींवरुन ५ कोटींवर, २०१५ मध्ये ५ कोटींवरुन ३ कोटींवर आणि २०१६ मध्ये ३ कोटींवरुन १ कोटी ५० लाखांवर उलाढाल घसरल्याने सराफा चिंतेत आहेत.
सराफा बाजारातील उलाढाल दीड कोटींच्या घरात !
By admin | Updated: May 10, 2016 00:02 IST