परंडा/भूम : मागील काही दिवसांपासून बीएसएनएल सेवेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असतानाही वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. सोमवारी देखील मोबाईलबरोबरच नेट सेवा विस्कळीत झाल्याने भूम, परंड्यासह वाशी तालुक्यांतील अनेक बँकाचे व्यवहार ठप्प झाले. याचा फटका या परिसरातील हजारो खातेदार शेतकऱ्यांना बसला.
तीन तालुक्यांतील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, खरीप पेरणीसाठी बी-बियाणे खरेदीकरीता शेतकऱ्यांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने बँक व इतर कार्यालयात गर्दी होणे अपेक्षितच असते. शेतकरी मोठ्या आशेने बँकेतून पैसे काढून बी-बियाणे खरेदी करावेत या हेतूने बाहेर पडले होते. मात्र बीएसएनएलची नेटसेवा बंद पडल्याने अनेक बँकाचे व्यवहार ठप्प झाले.
त्यातच सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने चाकरमान्यांनी पाल्यांना दप्तर, वह्या घेण्याकरिता पैशाच्या गरजेपोटी बँकेत गर्दी केली होती. परंतु त्यांचाही भ्रमनिरास झाला. याचबरोबर बीएसएनएलचे मोबाईलही बंद पडल्यामुळे अनेक बीएसएनएल धारकांची गैरसोय झाली. एरव्ही बँकात पाय ठेवण्यास जागा नसते. परंतु आज बँकेत शुकशुकाट दिसून आला. या संदर्भात दूरसंचार विभागाकडे चौकशी केली असता, कळंब, उस्मानाबाद या दोन शहराच्यामध्ये दूरसंचार सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे भूम-परंडा व वाशी या तिन्ही तालुक्यांत बीएसएनएल ची सेवा बंद असल्याची माहिती मिळाली.सदर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच मोबाईल व नेट सेवा सुरु होईल, असे कनिष्ठ अभियंता सी.पी. पाठक यांनी सांगितले. (वार्ताहर)
जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा मागील काही महिन्यांपासून सातत्याने विस्कळीत होत आहे. याचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. बीएसएनएलच्या उस्मानाबाद येथील वरिष्ठांकडेही यासंदर्भात अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली जात नसल्याचे अनेकांनी सांगितले. बीएसएनएलचे जिल्हाभरातील महत्त्वाचे अधिकारी मुख्यालयी रहात नसल्याने दाद कोणापुढे मागायची, अशी व्यथा अनेक ग्राहकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. सेवा ठप्प होण्याबरोबरच इतर किरकोळ तक्रारीही दिवसेंदिवस वाढत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे खाजगी स्पर्धकांना मात्र मोकळे रान मिळत असल्याचे चित्र आहे.
४मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा वारंवार ठप्प होत आहे. याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर केबल तुटल्याचे कारण सांगून वेळ मारुन नेहली जाते. केबलचे काम सातत्याने जिल्ह्यात कुठे ना कुठे सुरु असते. मात्र दुरुस्तीवर लाखोंचा खर्च होऊन समस्या संपत नसल्याने केबल दुरुस्तीवर होणारा खर्च केवळ गुत्तेदार जगविण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. बीएसएनएल सेवेच्या त्रुटीसंदर्भात उस्मानाबाद येथील कार्यालयात तक्रारी घेऊन गेलेल्या ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने हा ग्राहक नाविलाजाने खाजगी सेवेकडे वळत आहे. मात्र याचेही अधिकाऱ्यांना सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.