औरंगाबाद : शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबत गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. मुकुंदवाडी, क्रांतीचौक ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या दोन्ही ठाण्यांचे विभाजन करून तेथे अनुक्रमे विमानतळ पोलीस ठाणे आणि वेदांतनगर पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपासून शासनाकडे पडून आहे. हा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आणि वाढत्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता प्रायोगिक तत्त्वावर शहरात तीन पोलीस चौक्या सुरू करण्यात येत आहेत.पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, औरंगाबाद शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तुलनेत मुकुंदवाडी आणि क्रांतीचौक ठाण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल होतात. यावर्षी आॅक्टोबरअखेरपर्यंत मुकुंदवाडी ठाण्यात ७७५ तर क्रांतीचौक ठाण्यात ७५० गुन्हे नोंदविण्यात आले. या दोन्ही ठाण्यांचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे या ठाण्यांचे विभाजन करून अनुक्रमे विमानतळ पोलीस ठाणे आणि वेदांतनगर पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव २०१० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी शासनास सादर केलेला आहे. पाच वर्षांपासून हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. नवीन ठाणे मंजूर होईपर्यंत या दोन्ही ठाण्यांतर्गत स्वतंत्र पोलीस चौक्या सुरू करण्यात येत आहेत. यासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी वर्गही देण्यात येत आहे.
लवकरच तीन स्वतंत्र पोलीस चौक्या
By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST