अंबड : महावितरणने मागील तीन महिन्यांपासून वीजबील वाटप केले नसल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच महावितरणमध्ये खळबळ उडाली. कंत्राटदार एजन्सी आपले कंत्राट संपल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे ही वीजबिले गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होत. वीजबील वाटप व रिडींगचे कंत्राट जालना येथील मदर महिला बहुउद्देशीय बचत गटाला देण्यात आल्याचे महावितरण प्रशासनाने सांगितले. मात्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बचत गटाच्या संचालिका शाजिया जमील शेख म्हणाल्या की, तीन महिन्यांपूर्वी आमचे कंत्राट संपले असून, आम्ही मागणी करुनही महावितरणने मुदत न वाढविल्याने आम्ही काम थांबविले आहे.यामुळे महावितरणच्या वीजबील वाटपाच्या महाघोळात भर पडली आहे. वीजबील वाटप करणारी कंत्राटदार खाजगी एजन्सी आपण वीजबील वाटपाचे काम मागील तीन महिन्यांपासून बंद केल्याचे सांगत आहे. तर महावितरण वीजबील वाटपाचे काम खाजगी कंत्राटदाराकडे सांगत आहे. विशेष म्हणजे शहर व परिसरातील वीज ग्राहकांकडे १ कोटी ८७ लाख रुपयांची थकबाकी असताना वीज बील वाटपाबाबत झालेल्या या अक्षम्य गोंधळास कोण जबाबदार आहे व नागरिकांना कोणतीही चूक नसताना सोसाव्या लागणाऱ्या या मानसिक व आर्थिक भुर्दंडाची जबाबदारी कोणाची, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. शहर व परिसरात ४ हजार ४२८ घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वीजजोडणी आहेत. या वीजमीटरची रिडींग घेण्याविषयी व वीजबील वाटपाविषयी अनेक तक्रारी आहेत. याविषयी महावितरण कार्यालयातही नागरिकांनी वेळोवेळी दाद मागितली आहे. मात्र, सध्या महावितरणच्या गलथान कारभाराने कळसच गाठला असून, शहरातील बहुतांश नागरिकांना तीन महिन्यांपासूनचे वीजबीलाचे वाटपच झालेले नाही. नागरिकांनी वारंवार मागणी करुनही त्यांना बील मिळाले नाही. शहर व परिसरातील वीज ग्राहकांकडे तब्बल १ कोटी ८७ लाख रुपयांची थकबाकी आहे. याची वसुली कशी करावी याविषयी महावितरण योजना आखत असताना नागरिकांना मागील तीन महिन्यांचे वीजबील वाटपच न केल्याचा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वीजबीलाचे वाटप झाले नसल्याच्या प्रकाराविषयी कंत्राटदार मदर महिला बहुउद्देशीय बचत गट, जालना व महावितरण कंपनी दोघेही आपली जबाबदारी झटकत असल्याने मागील तीन महिन्यांचे वीजबील आहेत तरी कोणाकडे हा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
तीन महिन्यांपासून वीज बिले आहेत तरी कुठे ?
By admin | Updated: September 6, 2015 23:53 IST