जालना : जिल्ह्यासह औरंगाबादमध्येही घरफोड्या करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर औरंगाबाद, जालना व परतूर येथे विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. विक्रमसिंग धतुरासिंग टाक (वय १९, रा. गुरूगोविंदनगर), मनोहरसिंग प्रेमसिंग टाक (वय २२, रा. गुरूगोविंदनगर, ह.मु. आनंदनगर) आणि पिंक्या उद्धव काळे (वय २८, पारधीवाडा, परतूर) अशी अटक केलेल्या या आरोपींची नावे आहेत. जालना शहर व परतूरमध्ये चोऱ्या केल्याची कबूली या आरोपींनी दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. विक्रमसिंग टाक याने औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी भागातून एक मोटारसायकल चोरी करून आणल्याची कबूली दिली. आरोपींच्या ताब्यातून सोन्याचांदीचे दागिने व एक मोटारसायकल असा ७ लाख ५० हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या आरोपींकडून औरंगाबाद व जालना जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी चोरी, घरफोडी केल्याची माहिती उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सपोनि शुभांगी सूर्यवंशी, पोउपनि सुरेश भाले, अर्जुन पवार, सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, सचिन चौधरी, सागर बावीस्कर, दीपक पाटील, हिरामण फलटणकर, वैभव खोकले यांनी ही कामगिरी केली.
घरफोडीतील तीन अट्टल गुन्हेगार गजाआड
By admin | Updated: May 10, 2015 00:19 IST