उस्मानाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून दोन दिवसांत ११ छावण्यांतील ९६६ शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी सुमारे दीडशेवर शेतकरी वेगवेगळ्या आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे.जिल्हाभरात सध्या अकरा चारा छावण्या सुरू आहेत. या छावण्यांमध्ये त्या-त्या परिसरातील शेतकरी पधुन घेवून जात आहेत. अशा शेतकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्याबाबत पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाकडून पशुपालक शेतकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या होत्या. या पथकांनी शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात छावणीवर जावून तेथील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. या उपक्रमाचा सुमारे ९६६ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यापैकी सुमारे ६४ शेतकऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा विकार आढळून आला आहे. मधुमेह असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही काही कमी नाही. ५७ शेतकऱ्यांमध्ये हा विकार असल्याचे समोर आले आहे. २३ जणांच्या नेत्रांमध्ये मोतीबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर वेगवेगळ्या आजारामुळे ३९ रूग्ण त्रस्त आहेत. सदरील रूग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दीडशेवर शेतकऱ्यांना गंभीर आजार
By admin | Updated: November 29, 2015 23:16 IST