हिंगोली : जिल्ह्यात प्रशासनाने टँकरवरच भर देणे सुरू केले असून आता टंचाईचा काळ कमी असल्याने इतर उपायांपेक्षा हा पर्याय स्वस्त असल्याचे त्यांना वाटत आहे. मात्र काही गावांना टंचाईत कामे केल्यास कायमस्वरुपी उपाय होणार आहे. त्यामुळे दुरुस्ती व इतर पर्यायही डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे.एप्रिल महिना अर्ध्यावर आला आहे. मे महिना काढला तर जूनमध्ये यंदा वेळेवर मान्सून दाखल होईल, अशी प्रशासनाला आशा आहे. हवामान खात्याचा अंदाज कितपत खरा ठरेल, याचा नेम नाही. मात्र त्यामुळे नव्या उपायांपेक्षा टंचाई असल्याचे दिसून आले की, थेट टँकर सुरू केले जात आहे. एखाद्या गावात दुरुस्ती अथवा पूरक योजनेने कायमचा स्त्रोत उभा राहात असल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय अधिग्रहणांकडेही कल आहे. मात्र काही गावांत लोकसंख्येनुसार हे स्त्रोत अपुरे पडत आहेत. परंतु शासकीय नियमांची अडचण समोर करीत जनतेला आहे त्या परिस्थितीतच टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या अधिग्रहणांची संख्या २७६ वर पोहोचली आहे. यात टँकरसाठी केलेल्या अधिग्रहणांचाही समावेश आहे. त्यात हिंगोली-२९, कळमनुरी-५९, सेनगाव-६९, वसमत-७७ तर औंढा नागनाथ ४२ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यापैकी २२ अधिग्रहणे ही टँकरसाठी केलेली आहेत.यात टँकरवर तहान भागत असलेल्यांची हिंगोली-१६२३0, कळमनुरी-१२४0४, वसमत-७६६१ व औंढा ८६४५ अशी लोकसंख्या आहे. सेनगावात मात्र अद्याप एकही टँकर सुरू नाही. (प्रतिनिधी)हिंगोली तालुक्यात बळसोंड, कारवाडी व कनका या तीन गावांसाठी ७ टँकर, कळमनुरी तालुक्यात महालिंगी तांडा, खापरखेडा (पानबुडेवस्ती), पेठवडगाव, सिंदगी, पोत्रा, माळधावंडा, दाभळी, कुपटी, शिवणी बु., येडशी या दहा गावांसाठी १0 टँकर सुरू आहेत. सेनगाव तालुक्यात मात्र अजून एकाही ठिकाणी टँकरची गरज भासली नाही. या तालुक्यातील काही गावांत घेतलेल्या नवीन बोअर्सला पाणी लागल्याचाही हा परिणाम आहे. वसमत तालुक्यात लहान, लोन, पळसगाव, वाखारी, बाभूळगाव या पाच गावांत पाच तर औंढा तालुक्यातील रामेश्वर, काकडदाभा, संघानाईक तांडा, काळापाणी तांडा, कोळीतांडा, चिंचोली नि., लक्ष्मणनाईक तांडा या ७ गावांत ५ टँकर सुरु आहेत. एकूण २७ टँकरच्या ७५ खेपा या गावांत होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
४५ हजार लोकांची भागतेय टँकरवर तहान
By admin | Updated: April 16, 2016 01:36 IST