लातूर : अत्यंत सामान्य घरातून पुढे आलेल्या व शिक्षक म्हणून नावारुपाला आलेले काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे हे तसे अपघातानेच राजकारणात आले़ निवृत्तीनंतर वकिलीचा मानस असताना अचानक स्व़विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार १९९२ साली पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली अन् ती जिंकलीही़ त्यानंतर २०१२ मध्ये लढविलेल्या दुसर्या निवडणुकीतही ते विजयी झाले़ मात्र, संसदीय निवडणुकीत त्यां चा पराभव झाला अन् विजयाची हॅट्ट्रीक हुकली़ उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर जन्मभूमी तर गंगापूर कर्मभूमी़ प्रतिकूल परिस्थितीत सातवीपर्यंचे शिक्षण येणेगुरातच घेतले़ आई-वडील मोलमजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवीत़ परंतु, शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिल्यानंतर बनसोडे सोलापुरात आले़ तेथे ते संताच्या बोर्डिंगमध्ये राहून डॉ़बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये मॅट्रीकपर्यंत शिकले़ ११वी ते एम़ए़ पर्यंतचे शिक्षण त्यांनी सोलापुरातल्या दयांनद महाविद्यालयात घेतले़ एम़ए़ चे शुल्क भरताना त्यांच्या वडिलांनी घरातील एकमेव पितळी घागर विकल्याची आठवण गुरुजी आजही सांगतात़ वकिलीचे स्वप्न पाहिलेल्या गुरुजींना त्यांचे वडील गुंडेराव हा लबाडीचा व्यवसाय असल्याचे सांगून दुसरे कोणतेही शिक्षण घेण्याचा सल्ला देत होते़ त्यानुसार दत्तात्रय बनसोडे यांनी एम़ए़ केले़ पुढे दोन वर्षे त्यांनी लातुरातील यशवंत विद्यालयात शिक्षकाची नोकरी केली़ त्यानंतर लातूरजवळील गंगापूर येथे जयकिसान विद्यालयात १९७१ला रुजू झाले़ मुख्याध्यापकही झाले़ दरम्यान त्यांना काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचा सहवास लाभला़ १९९२ साली त्यांच्याच सूचनेवरुन ध्यानीमनी नसतानाही गुरुजींना जिल्हा परिषदेला थांबावे लागले़ चांगल्या मतांनी विजयीही झाले़ निवृत्तीनंतर दुसर्यांदा संधी मिळाली़ यावेळी ते विजयासह जि़प़अध्यक्षही बनले़ परंतु, लोकसभेच्या रणांगणात उतरुन कारकिर्दीतील विजयाची हॅट्ट्रीक साधण्यात मात्र ते अयशस्वी ठरले़
तिसर्या निवडणुकीत गुरुजींना धक्का
By admin | Updated: May 17, 2014 00:21 IST