उमरगा : नगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या वादामुळे मागील वर्षभरापासून रखडलेली उमरगा नगर पालिकेची सर्वसाधारण सभा अखेर बुधवारी उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शहरात गंभीर बनलेल्या पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा होवून विकासाच्या दृष्टीने सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या २१ कामांचे ठराव मंजूर करण्यात आले. १८ जून २०१५ रोजी तब्बल तेरा महिन्यानंतर नगराध्यक्षा केवलबाई औरादे यांनी पालिकेची सर्वसाधारण सभा बोलाविली होती. मात्र, यावेळी सत्ताधारी नगरसेवकांनीच नगराध्यक्षांना धारेवर धरून सभागृह सोडून जाण्यास भाग पाडले होते. त्यानंतर उपनगराध्यक्ष धनंजय मुसांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. मात्र, या बैठकीत मंजूर झालेले विषय रद्दबातल ठरविण्याची मागणी नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यामुळे हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. त्यानंतर आजपर्यंत पाच वेळा सभा बोलाविण्यात आली. परंतु, सत्ताधारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यातील वादामुळे एकही सभा होवू शकली नाही. याबाबत विरोधी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलनही केले होते. सर्वसाधारण सभेअभावी शहरातील अनेक प्रश्न रखडले आहेत. ही बाब गांभिर्याने घेत अखेर जिल्हाधिकाऱ्यांनीच उमरगा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करीत पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार २३ रोजी ही सभा पार पडली. यावेळी दलित वस्ती सुधार योजनेतील नवीन कामे, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे, मुदत संपलेल्या विकास कामांची मुदत वाढवून देणे यासह शहरवासियांसाठी गंभीर असलेल्या पाणी प्रश्नाबाबत माकणी धरणात नवीन तीन पंप बसविणे, केबल टाकणे, पाणी गळती रोखण्यासाठी दुरूस्ती आदी २१ ठराव मंजूर करण्यात आले. तब्बल दहा कोटींच्या विकास कामांना या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे रखडलेली अनेक कामे आता मार्गी लागतील, अशी आशा शहरवासियांना आहे. यावेळी काही विषय बहुमत नसल्याने बारगळल्याचेही समजते. नगराध्यक्षा केवलबाई औरादे यांनी त्यांच्या कार्यकाळात वापरलेल्या वाहनाचे भाडे चार लाखाहून अधिक झाले आहे. त्यामुळे हे भाडे त्यांच्याकडूनच वसूल करावे, असे आदेश उपविभागीय अधिकारी श्रींगी यांनी यावेळी मुख्याधिकाऱ्यांना दिले. तसेच ही वसुली नाही झाल्यास तुमच्याच पगारातून ते वसूल केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ४पालिकेला नगराध्यक्ष असताना प्रशासनातील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सभा घ्यावी लागणे, ही बाब दुर्दैवाची आहे. सत्ताधाऱ्यांनी मागील चार वर्षात जनतेच्या प्रश्नाविषयी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, हेच दाखवून दिले असल्याचा आरोप विरोध गटनेते सतीश सुरवसे यांनी केला.४ नगराध्यक्ष व विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी संगनमत करून उमरगा शहराचा विकास थांबविला होता. शहरात पाणीप्रश्न गंभीर असताना नगराध्यक्षांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच आता प्रशासनाने याची दखल घेतल्याने आगामी काळात शहरातील विकास कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा असल्याचे शिवसेना नगरसेवक रझाक अत्तार म्हणाले.
दहा कोटींच्या कामांना मंजुरी
By admin | Updated: December 23, 2015 23:52 IST