औरंगाबाद : लाखोंपेक्षा अधिक महिलांना ‘सखी मंच’ नावाच्या विसाव्याखाली एकत्र आणून त्यांच्यामध्ये नवीन ऊर्मी निर्माण करणाऱ्या सर्वांच्या आदरणीय ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वरज्योती भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात भाभीजींना सूरमयी श्रद्धांजली देण्यात आली. या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन लोकमत सखी मंचच्या वतीने लोकमत भवन येथे करण्यात आले होते.गायक रवींद्र खोमणे यांच्या दमदार स्वरांनी या भजनसंध्येला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे आराध्यदैवत अर्थात पांडुरंगाचे नामस्मरण करून भक्तीचा जागर करण्यात आला. ‘माझे माहेर पंढरी’ हे अनेकांच्या आवडीचे पद रवींद्र खोमणे यांनी मोठ्या ताकदीने सादर केले. गायिका अनघा काळे यांनी त्यांच्या मधुर स्वरांच्या साथीने आई भवानीची आराधना केली. त्यांनी सादर केलेले ‘आई भवानी तुझे लेकरू’ सखींना विशेष आवडून गेले. ग. दि. माडगूळकर यांची रचना आणि सुधीर फडके यांचे संगीत असणाऱ्या ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार’ या सुरेल गाण्यावर सर्व सखींनी भक्तिमय ठेका धरला होता. हे गाणे कुणाल वराळे यांनी सादर केले. अनुप जलोटा यांचे ‘ऐसी लागी लगन’ आणि यासारखी अनेक भक्तिगीते या स्वरज्योती भजनसंध्येत गायली गेली.प्रत्येक भजनाला सखींची मिळणारी दाद क लाकारांचा उत्साह वाढवणारी होती. भजनामागची पार्श्वभूमी, भजनाचा आशय याविषयी सखींना माहिती देत प्रा. महेश अचिंतलवार यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले. मुख्य कलाकारांना राजेश जगधने, राजेंद्र वैराळ, जितेंद्र साळवी, स्टॅलिन शेलार, संदीप यांनी वाद्यांवर साथसंगत केली.
भक्तिमय वातावरणात सूरमयी श्रद्धांजली...
By admin | Updated: March 26, 2016 23:56 IST