राजकुमार जोंधळे ल्ल लातूरशहर व जिल्ह्यात उन्हाचा पारा आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याने, सकाळी ११ वाजता घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. परिणामी शहरातील सर्वच रस्त्यावर सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. विशेष म्हणजे वाढत्या उन्हाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. उन्हाचा पारा कमाल ४४ तर किमान ३४ अंशावर पोहचला आहे. हे तापमान गत पाच वर्षातील सर्वाधिक असल्याची नोंद आहे.लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून अल्प पर्जन्यमान आहे. परिणामी दुष्काळासह तीव्र पाणीटंचाईच्या झळा येथील नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. आता उन्हाचा पाराही कमाल ४४ तर किमान ३४ अंशावर गेल्याने घराबाहेर पडणेही कठिण झाले आहे. सकाळी ९ वाजताचा उन्हाचा चटकाही आता सहन होत नाही. दुपारच्या उन्हाचा चटका आणि झळा सहन करण्यापलिकडच्या आहेत. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर शनिवापर्यंत नोंद असलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या तापमानाला अल्प पर्जन्यमान आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अधिक जबाबदार असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले.लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई, शिवाजी चौक, गांधी चौक, राजीव गांधी चौक आदी भागात दुपारच्या वेळी शुकशुकाट आहे़ शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थीही उन्हापासून बचावासाठी टोपी, रूमालचा वापर करीत आहेत़ शिवाय, उन्हापासून बचावासाठी लागणाऱ्या साहित्यांची विक्रीही वाढली आहे़ उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुले आणि वृध्द मंडळींच्या आरोग्यावर अधिक परिणाम होतो. लहान मुलांना दिवसांतून टप्प्याटप्प्याने भरपूर पाणी पाजले पाहिजे. त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर वृध्द मंडळींनी आपल्या आहारावर लक्ष केंद्रीत करुन, उन्हात फिरणे टाळले पाहिजे. मधूमेह, रक्तदाब आणि इतर आजार असणाऱ्या व्यक्तिंनी उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी साधने वापरली पाहिजेत. तीव्र उन्हामुळे जुलाब, पचनक्रियेत बिघाड, सतत तहान लागणे आणि ताप, चक्कर येणे आदी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. ओमप्रकाश कदम यांनी सांगितले.उष्णतेच्या लाटेचा परिणाम : जंगलाचे प्रमाण घटले़़़एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार सध्याला उष्णतेची लाट सर्वत्र सुुरु असून, यामुळे उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. परिणामी, सकाळपासूनच घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. पूर्वीच्या निजाम स्टेटमध्ये तेलंगणा आणि मराठवाडा हा कायम दुष्काळी आणि उष्ण तापमानाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. जंगलाचे प्रमाण अल्प असल्याने हा परिणाम आपल्याला जाणवू लागतो. तेलंगणा आणि मराठवाड्याच्या डोंगराळ प्रदेशात या उष्णतेची लाट प्रत्येक वर्षी असते. यामुळे तेलंगणात आजपर्यंत सर्वाधिक उष्मघाताच्या बळीची नोंद असून, आता याचे लोण मराठवाड्यातही पोहचले आहे. शनिवारी उष्मघातामुळे उदगीर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.पाच वर्षांपासून तापमान चिंताजनकलातूर हे उंचवट्यावर आहे, मात्र येथील वाढते तापमान अधिक चिंताजनक आहे. २०१२ मध्ये सर्वात अधिक तापमानाची नोंद झाली होती. या तापमानाच्या आकड्यात वर्षागणिक वाढ झाली असून, यंदा तापमानाचा पारा ४४ अशांवर पोहचला आहे. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक तापमान म्हणून याची नोंद आहे. अर्थात लातूर जिल्ह्यातील तापमान वर्षागणिक वाढत आहे. याला आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड अधिक जबाबदार आहे. जगभरातच पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा हा परिणाम असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी सांगितले.
उन्हाचा पारा ४४ अंशांवर
By admin | Updated: April 16, 2016 23:41 IST