उस्मानाबाद : तुळजापूर प्राधीकरणाच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे सुरू असून, शासकीय यंत्रणेने प्रत्येक कामाचा क्लोजींग रिपोर्ट तात्काळ सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.तुळजापूर शहरात झालेल्या विविध विकास कामांसंदर्भात आयोजित बैठकीत डॉ. नारनवरे बोलत होते. जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे, गुण नियंत्रणचे सलगरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस. एस. बुबणे, प्रशासकीय सल्लागार ज्ञानोबा फुलारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रणजीत हांडे, प्राधीकरणाचे तांत्रिक सल्लागार दराडे, नगर अभियंता एम. आर. फारूखी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी डॉ. नारनवरे म्हणाले, प्रत्येक कामाचे क्लोजर रिपोर्ट सादर करताना कामाची सुरूवात व कामाचा शेवट कधी झाला, ते काम किती कालावधीसाठी दिले होते व किती दिवसात पूर्ण झाले. बारचार्ट, मेजरमेंट गोषवारा, कामांबाबतचे आक्षेप, संबंधित विभागाला कधी हस्तांतरण केले त्याचा अहवाल आदी त्यासोबत जोडणे आवश्यक आहे. शहरात प्राधीकरणाचे ४२ रस्ते विकसित करण्यासाठी सहा कंत्राटदारांकडून काम करून घेतले जात आहे. बीडकर तलाव येथे बगिचा विकासित करणे, भवानी मंदिर ते शुक्रवार पेठ पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता रूंदीकरण व विकास, शहरासाठी नवीन भुयारी गटार योजना, पापनाश तलावाची खोली वाढविणे व सुशोभीकरण करणे, विद्युतीकरणाच्या कामावर सनियंत्रण ठेवण्यासाठी कामांबाबत मागणी नोंदविणे, बारचार्ट प्रमाणे काम करणे, आदी कामांचा त्यांनी आढावा घेतला. कंत्राटदारांनी बारचार्ट वेळेत देणे बंधनकारक असल्याचे सांगून आपल्याकडे देण्यात आलेली कामे विनाविलंब पूर्ण करावीत. या कामांवर पर्यवेक्षणीय दिरंगाई करणाऱ्या शासकीय यंत्रणेतील अभियंत्यांवर कारवाई केली जाईल. जीवन प्राधीकरणाने शहरातील ड्रेनेज व पाणीपुरवठ्याची कामे तात्काळ पूर्ण करावीत. यासाठी नगर परिषद व संबंधित विभागाने दिलेल्या कामांची तात्काळ पूर्तता करावी. या सर्व कामांवर गुणनियंत्रकांनी विशेष लक्ष देऊन अहवाल सादर करावा, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केल्या. बैठकीस अधिकाऱ्यांसोबतच कर्मचारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)तुळजापूर विकास प्राधीकरणाअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली. परंतु, यातील काही कामे वेळेत सुरू झाली नाहीत. त्यामुळे अशा कंत्राटदारांना तात्काळ नोटिसा बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यावेळी संबंधितांना दिले. तसेच प्राधीकरण कामांना गती येण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केल्यासच प्रलंबित कामांना गती येणार असल्याचे ते म्हणाले.डॉ. नारनवरे यांनी यावेळी वगळण्यात आलेल्या भागाबाबतही बैठक घेऊन चर्चा केली. वगळलेल्या भागाचा नकाशा तयार करणे तसेच आंबेडकर चौक ते कमान वेस रस्ता, शिवाजी दरवाजा ते पार्र्कींग, महाद्वार ते राष्ट्रीय महामार्ग, पावन लॉज ते पार्र्कींग या वगळण्यात आलेल्या भागाच्या नकाशाचे अवलोकन केले. तसेच या भागातील संबंधित नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. या कामांना किती निधी लागणार आहे, याचे अंदाजपत्रकीय विवरणपत्र तयार करून शासनास मागणी सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच या कामांपैकी किती सुरू करता येतील, याचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
पूर्ण कामांचा अहवाल तात्काळ सादर करा
By admin | Updated: November 13, 2014 00:49 IST