देवगाव रंगारी : कन्नड तालुक्यातील जवळी बु. येथील ओम शांती माध्यमिक विद्यालयात शिकत असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपविली. ही खळबळजनक घटना ११ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रूपेश अशोक साळवे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, जवळी (बु.) येथील ओम शांती माध्यमिक विद्यालयात कल्याणी विलास हारदे ही विद्यार्थिनी दहावीमध्ये शिकत होती. याच शाळेत आरोपी साळवे हा शिक्षकपदी कार्यरत आहे. तिने दहावीत प्रवेश घेतल्यानंतर १३ एप्रिल २०१५ ते ११ एप्रिल २०१६ या कालावधीत तो कल्याणीला राहत्या घरी, शाळेत, रस्त्यात प्रत्यक्ष भेटून आणि मोबाईलवर एसएमएस पाठवून त्रास देत होता.त्याचा हा त्रास असह्य झाल्याने तिने ११ एप्रिल २०१६ रोजी दुपारी १.३० ते २ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विष सेवन केले. ही घटना नातेवाईकाच्या निदर्शनास येताच ते तिला उपचारासाठी औरंगाबादला नेत होते. त्याचवेळी प्रवासातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जवळी बु. येथे खळबळ उडाली. एका शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे वृत्त परिसरात पसरले. याबाबत नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. या प्रकरणी मुलीचे वडील विलास हारदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात आरोपी साळवेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजश्री आडे करीत आहेत.