औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी संस्कारक्षम पिढी घडविण्यावर शिक्षकांचा अधिक भर असायचा. आज विद्यार्थ्यांवर नुसते संस्कार करून उपयोग नाही, तर त्यांना किमान कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञानही अवगत झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग शालेय अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करीत आहे. इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षणही देण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावे यासाठी शिक्षण विभागातर्फे वारंवार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. या बदलामुळे अवघ्या सात-आठ वर्षे वयाच्या मुलांना शाळेत नवीन अभ्यासक्रमानुसार व्यावसायिक शिक्षणाचे धडे गिरविता येतील. पाठ्यपुस्तकातील मोठमोठे धडे वाचून प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आकलन क्षमता लक्षात घेऊन सहज लक्षात राहील अशा गोष्टींवर नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याची माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक चंद्रमणी बोरकर यांनी दिली. अभ्यासक्रमात करण्यात आलेले बदल मुलांचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टिकोनातून योग्यच आहेत. सध्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनावर येणारे दडपण कमी होईल. शालेय जीवनातच त्यांचा पाया मजबूत झाल्यास ही पिढी भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षांना सहजपणे तोंड देऊ शकेल, असे मत पाठ्यपुस्तक मंडळाचे व्यवस्थापक भागवत पुरी यांनी व्यक्त केले.पुढील वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे २०१५-१६ मध्ये पाचवीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा अभ्यासक्रम बदलण्यात येणार होता, काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. भविष्यात चांगले आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थी शालेय जीवनापासून तयार व्हावेत या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात आणखी नवीन प्रयोग अभ्यासक्रमात दिसून येतील यादृष्टीने शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षणाचे धडे!
By admin | Updated: May 25, 2014 01:31 IST