औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषद होणार, अशी घोषणा झाली आणि नंतर बांधकामे करणे कठीण होईल म्हणून नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनी प्लॉटवर बांधकामाला गती दिली असून, एक मजली बांधकाम तीन ते पाच मजल्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. सातारा भागात एन.ए.- ४४ च्या परवानगी बोटावर मोजण्याइतक्याच नागरिकांकडे असून, अनेकांनी ग्रामपंचायतीकडे कोणतीही परवानगी मागितली नसल्याचे चित्र आहे. एनए- ४७ बी साठी महसूल विभागाकडे ग्रामपंचायतीने साडेदहा हजार फायली सादर केल्या आहेत. त्या फायली सिडकोच्या टाऊन प्लॅनिंग विभागात अहवालाशिवाय पडून आहेत. ग्रामपंचायतीचा आवाका पाहता येथील विकास कामांना गती देण्यासाठी शासनाने साताऱ्याला नगर परिषदेचा दर्जा जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता साताऱ्यातील मोकळ्या भूखंडावर बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामाला जोर दिला असून, कामाची गती वाढली आहे. देवळाई परिसरात १५ कामे, तर सातारा परिसरात २५ पेक्षा अधिक कामे सुरू असून देवळाई रोड व रेणुकामाता मंदिर रोडलगत तीन ते पाच मजली इमारती झपाट्याने उभ्या राहत आहेत. नगर परिषद झाल्यावर घर बांधणी व इतर कर नगर परिषदेला अदा करावे लागणार असल्याचे गुपित नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांच्या लक्षात आल्याने इमारतीचे सांगाडे झपाट्याने आकाशाकडे झेपावत आहेत. बांधकामाला मजूर मिळत नसल्याने कामगार नाक्याहून नगदी हजेरी देऊन मजूर आणावे लागत आहेत. स्थानिक नागरिकांनीही कोणतीही परवानगी न काढता दुसरा मजला चढविल्याचे प्रकार वाढले आहेत. याची माहिती ग्रामपंचायतीलाही नसल्याचे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी टी.बी. साळवे यांचे म्हणणे आहे. अधिकारी म्हणतातसिडकोचे वरिष्ठ नियोजनकार आशुतोष उइके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एनए- ४७ बी च्या फायलीवर काय करायचे, याविषयी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. नगर परिषद की ग्रामपंचायत, हा निर्णय अद्याप झालेला नाही. अन्यथा, विनापरवानगी जेही बांधकाम झालेले आहे, त्यांच्यावर केव्हाही कारवाई होऊ शकते.
बांधकामांचा सपाटा सुरू
By admin | Updated: July 6, 2014 00:34 IST