तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरातील १६ गावात शेकडो एकरामध्ये महामंडळाचे महाबीज सोयाबीन जेके ३३५ लॉट नं. ६६३ या वाणाची पेरणी केली आहे. सद्य स्थितीत भेसळयुक्त बियाणे निघाल्याने ६० टक्के झाडांच्या शेंगा पक्वतेचा अवस्थेत असून, ४० टक्के झाडांना नुकतेच फुल धारणा होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तळणी येथील सद्गुरू समर्थ कृषी सेवा केंद्रावरून तळणीसह दहीफळ खंदारे,तळेगाव, वडगाव, दूधा, वझर सरकटे, आनंदवाडी, सासखेडा, कोकंरबा, शिरपूर, देवढाणा, कानडी, वाघाळा, दहातांडा, जाभरु म व वझर कुटे या गावातील ७० शेतक-यांनी १०० पेक्षा अधिक बॅग महामंडळाचे महाबीज सोयाबीन जेके ३३५ लॉट नं. ६६३ (आॅक्टो-१५-१३-२१०६-६६३) या वाणाची खरेदी केली. शेकडो एकरावर पेरणी झालेली आहे. सद्य स्थितीत सोयाबीन पीक जोमात आहे. मात्र , महामंडळाचे महाबीज सोयाबीन जेके ३३५ लॉट नं. ६६३ या वाणात भेसळ आढळून आली आहे. सद्य स्थितीत भेसळयुक्त बियाणे निघाल्याने ६० टक्के झाडांच्या शेंगा पक्वतेचा अवस्थेत आहेत. तर ४० टक्के झाडांना नुकतेच फुलं धारणा होत असल्याने शेतक-याचा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येणार असून मोठे नुकसान होणार असल्याचे दिसून आले. ही बाब दहीफळ खंदारे येथील शेतकरी अजित खंदारे व तळणी येथील शेतकरी अमोल राऊत यांच्या निदर्शनास आल्यानंतर महाबीजचे अधिकारी, पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. महाबीजचे रोहीत गाढे तसेच तालुका कृषी अधिकारी एम.ए आम्ले यांनीही पाहणी केली.
सोयाबीनच्या भेसळयुक्त बियाणाचा शेतकऱ्यांना फटका
By admin | Updated: August 29, 2016 00:52 IST