महाविद्यालय स्तरावर ९ हजार तर कार्यालय स्तरावर २ हजार प्रस्ताव प्रलंबितलातूर : समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती यंदा त्रुटी तसेच आर्थिक तरतूदी अभावी ११ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे़ महाविद्यालय स्तरावर ९ हजार ७०८ प्रस्ताव समाजकल्याण विभागात दाखलच झाले नाहीत़ शिवाय, समाजकल्याण कार्यालय स्तरावरून १ हजार ८६० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तरतूदीअभावी रखडली आहे़ केंद्र शासनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते़ लातूर जिल्ह्यात २०१५ - १६ या शैक्षणिक वर्षात ४१ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते़ त्यातील २९ हजार ७७८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली़ २७ कोटी ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना वितरीत झाली आहे़ जिल्ह्यातील महाविद्यालयांकडून मात्र ९ हजार ७०८ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आले नाहीत़ त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही प्रलंबित आहे़ चालू शैक्षणिक वर्षात संबंधीत महाविद्यालयांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत़ समाजकल्याण कार्यालय स्तरावर १ हजार ८६० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तरतूदीअभावी प्रलंबित आहे़ ही शिष्यवृत्ती चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे़(प्रतिनिधी)
११ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली
By admin | Updated: May 10, 2016 00:02 IST