लातूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगळवारी जागतिक शौचालय दिन साजरा केला जाणार असून, या दिवशी जिल्ह्यात तीन हजार शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे़ लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात किमान पाच याप्रमाणे तीन हजार शौचालयाचे बांधकाम एकाच दिवशी पूर्ण केली जाणार आहेत़ हगणदारीमुक्त झालेल्या लातूर जिल्ह्यातील १२९ गावांत आत्मसन्मान ग्रामचा अशा घोषणा असलेल्या फलकाचे अनावरणही केले जाणार आहे़ हगणदारीमुक्तीचा उत्सव या दिनी साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी दिली़ मागिल १५ वर्षांपासून १९ नोव्हेंबर हा दिवस जागतीक पातळीवर शौचालय दिन म्हणून साजरा केला जात आहे़ स्वच्छता विषयक जनजागृतीच्या हेतूने शौचालय दिन पाळला जातो़ यावर्षी शौचालय व पोषणमुल्य ही संकल्पना घेऊन हा दिवस साजरा करण्यात येत आहे़ त्यानुसार लातूर जिल्ह्यात या एकाच दिवशी तीन हजार शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जगदाळे यांनी दिली़ जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने यावर्षी शौचालय बांधकामाचे तांत्रिक मार्गदर्शन, शौचालय वापराचे महत्त्व या विषयी माहिती दिली जाणार आहे़ ठिकठिकाणी कलापथकाच्या माध्यमातून मनोरंजनातून जनजागृती करण्यात येणार आहे़ या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत़ या दिनाचा समारोप निलंगा तालुक्यातील सावरी येथे केला जाणार आहे़ या सर्व कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी, गावागावांतील ग्रामस्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी केले़
एकाच दिवशी तीन हजार शौचालय बांधण्याचा संकल्प
By admin | Updated: November 17, 2015 00:30 IST