औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल-२०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेसाठी जातीनिहाय मतदारांचा आकडा २०११ च्या जनगणनेनुसार निश्चित होणार आहे. त्या आकडेवारीनुसार शहरात १२ प्रभाग एस.सी., एस.टी.साठी आरक्षित होतील, असा अंदाज आहे. त्यात सहा प्रभाग महिलांसाठी आरक्षित होतील. १२ प्रभाग म्हणजे २४ वॉर्ड होऊ शकतात. सध्या एस.सी.साठी १७ व एस.टी.साठी १ वॉर्ड आहे. म्हणजेच आणखी ६ वॉर्ड वाढू शकतात. नव्याने प्रभाग रचना करून ११४ वॉर्ड करण्यात येणार आहेत. २ लाख २९ हजार २२३ लोकसंख्या एस. सी. आणि १५ हजार २४० एस. टी. प्रवर्गाची लोकसंख्या आहे. ती आकडेवारी २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार आहे. त्यानुसार शहराची पूर्ण लोकसंख्या ११ लाख ७५ हजार ११६ इतकी आहे. त्यात ६ लाख ९ हजार २०६ पुरुष आणि ५ लाख ६५ हजार ९१० महिलांचा समावेश आहे. एस. सी. लोकसंख्येत १ लाख १७ हजार ६८४ पुरुष आणि १ लाख ११ हजार ५३९ महिलांचा समावेश आहे. असा असू शकतो प्रभाग गटनिहाय लोकसंख्येच्या आधारानुसार प्रत्येक २ हजार लोकसंख्येचा एक ब्लॉक आहे. असे १० ब्लॉक एका प्रभागात असतील. त्या ब्लॉकमधील लोकसंख्येच्या आधारावर प्रभागाची हद्द ठरेल. उदा. न्यायनगर, हुसैन कॉलनी या वॉर्डामध्ये पुंडलिकनगरच्या दोन गल्ल्यांचा समावेश आहे. त्या वॉर्डाला पुंडलिकनगर जोडून १० गटनिहाय ब्लॉक टाकल्यास एक प्रभाग होऊ शकतो किंवा विद्यानगर आणि न्यायनगर, हुसैन कॉलनी हा प्रभाग होऊ शकतो. असे सुरू आहे काम... उपायुक्त किशोर बोर्डे आणि मालमत्ता अधिकारी एस.पी. खन्ना यांच्यासह १६ कनिष्ठ अभियंत्यांची टीम जनगणनेतील प्रगणकांच्या लोकसंख्या मोजणीच्या माहितीनुसार प्रभागाचे नकाशे तयार करीत आहे. १ जून २०१४ पर्यंत नकाशा ड्राफ्टिंगची माहिती निवडणूक आयोगाला पाठवावी लागेल.
एस. सी., एस. टी. प्रवर्गासाठी १२ प्रभाग होणार?
By admin | Updated: May 27, 2014 01:21 IST