औरंगाबाद : आरटीओ कार्यालय दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुरुवारी काहीशी जाग आल्याचे चित्र दिसून आले. कार्यालयाचे एक गेट सकाळपासून बंद ठेवण्यात आले, तर दुपारनंतर दुसऱ्या गेटवर मोटार वाहन निरीक्षक आणि एका लिपिकास तैनात करण्यात आले. आतमध्ये येणाऱ्यांकडील कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना आत सोडण्यात येत होते; परंतु आतमध्ये असलेल्या दलाल मंडळींबाबत कोणतीही खबरदारी न घेतल्याने आतमध्ये दलाल आणि वाहनधारक बाहेर, असेच काहीसे चित्र दिसून आले.आरटीओ कार्यालयातील दरवाजा बंद ठेवण्यात येत असल्याने दलालांना आतमध्ये येता येत नसल्याचे आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगितले जात होते; परंतु कार्यालयाच्या परिसरात खुर्च्या टाकून रिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये बसून काम करणाऱ्या दलालांकडे कानाडोळा केला जात होता. यांना कोण हटविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. गुरुवारी सकाळपासून कार्यालयाचे एक गेट बंद ठेवण्यात आल्याने दलालांवर कारवाई होणार असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. त्यामुळे अनेक दलालांनी कार्यालयात येण्याचे टाळल्याचे दिसून आले. दुपारनंतर दुसऱ्या दरवाजावर वाहन निरीक्षक आणि लिपिकाकडून येणाऱ्यांकडील कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली. यामुळे गेटवर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे कार्यालय परिसरात अनेक दलाल मंडळी आपली कामे सुरळीतपणे करीत असल्याचे दिसून आले. तसेच वाहनांच्या टॅक्सचे शुल्क भरण्यासाठी वाहनमालकांना आणण्याची सूचनाही अनेकांना करण्यात आली, तर गेटवर काही प्रमाणात दलाल मंडळींना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे दिसून आले. ४दुपारपर्यंत अनेक दलाल मंडळी आपली कामे पूर्ण करण्यावर भर देतात. त्यामुळे दुपारनंतरच्या तपासणीचा त्यांच्या कामावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. गेटवर दररोज रोटेशननुसार मोटार वाहन निरीक्षक आणि लिपिकास तैनात क रण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियमित कामाबरोबर अशा प्रकारे अतिरिक्त काम करण्याची वेळ येणार आहे.
आरटीओत दलाल आतमध्ये तर वाहनधारक बाहेर
By admin | Updated: January 23, 2015 00:57 IST