औरंगाबाद : वरळी येथील नगरपालिका संचालनालयाचे उपसंचालक रमेश पवार यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांच्या थेट नियुक्तीमुळे पालिकेतील घोडेबाजाराला लगाम लागला आहे. आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी त्यांना आज पदभार दिला. पालिकेतील उपायुक्ताला त्या पदावर बसविण्यासाठी आजवर दोन वेळा प्रस्ताव सभेसमोर आला होता. मात्र, शासनाकडूनच ते पद भरण्यात येणार होते. सत्ताधाऱ्यांच्या दरबारात लोटांगण घेऊन चिरीमिरीच्या आधारे अनेक पदे पात्रता आणि व्हिजन नसलेल्या अधिकाऱ्यांनी मिळविली आहेत. त्याच आधारे अतिरिक्त आयुक्त या पदावर बसण्यासाठी काही जण तयारीला लागले होते. पवार यांची शासनाकडून थेट नियुक्ती झाल्यामुळे त्यांना वर्षभरानंतर शासनाकडे परत पाठविण्याचा ठराव घेणे कायदेशीररीत्या अवघड जाईल. उपायुक्त रवींद्र निकम यांना अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव उद्या १० जुलैच्या सभेसमोर सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठेवला होता. मात्र, २०११ साली तत्कालीन नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी मनपाला अतिरिक्त आयुक्तपदाबाबत लेखी कळविले होते. शासनाकडून ते पद नियुक्त होईल, असे त्या लेखी पत्रात म्हटले होते. त्याआधारेच पवार यांची नियुक्ती झाली आहे.उपायुक्तही मिळालेसुरेश पेडगावकर यांना शासनाकडे परत पाठविल्यानंतर आज सहनिबंधक कार्यालयातून डॉ.आशिष पवार आणि बी. एल. जाधव हे दोन उपायुक्त पालिकेला मिळाले आहेत.
घोडेबाजाराला शासनाचा लगाम
By admin | Updated: August 28, 2014 00:23 IST