औरंगाबाद : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला शहराचा विकास आराखडा नगररचना खात्याने अखेर मनपाला सादर केला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर आता हा आराखडा प्रसिद्ध केला जाणार असून, त्यावर नागरिकांना आपल्या सूचना आणि हरकती नोंदविता येणार आहेत. नवीन आराखड्यात शहराच्या अनेक भागांत निवासी वापरासाठी जमिनी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन विकास आराखड्यात कुठे, कोणते आणि कशा प्रकारे आरक्षण टाकण्यात आले आहे हे आराखडा प्रसिद्धीनंतरच स्पष्ट होणार आहे. शहराच्या सुनियोजित विकासासाठी याआधी १९९१ मध्ये शहराचा विकास आराखडा बनविण्यात आलेला आहे. आतापर्यंत याच आराखड्यानुसार शहराच्या विकासाचे नियोजन सुरूआहे; परंतु पंचवीस वर्षांच्या काळात मनपाच्या हद्दीत काही नवीन भाग अंतर्भूत झाला. तसेच शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे काही भागांतील रस्ते मोठे होणे अपेक्षित आहे. सोबतच ठिकठिकाणी शाळा, मैदाने, रुग्णालये आदींसाठी जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. या बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने २०१३ च्या सुरुवातीस नगररचना खात्यामार्फत शहराच्या नवीन विकास आराखड्याचे काम हाती घेतले. आता अडीच वर्षांनंतर नगररचना खात्याने हा आराखडा तयार केला आहे. नगररचना अधिकाऱ्यांनी हा आराखडा नुकताच मनपा आयुक्तांना सादर केला. आता तो सर्वसाधारण सभेसमोर सादर केला जाईल. सभेच्या मान्यतेनंतर त्यावर हरकती, सूचना मागविण्याची कार्यवाही होईल. नागरिकांना आराखड्यावर त्यांच्या सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी महिनाभराची मुदत असेल. नंतर हा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येईल.
शहर आराखडा सादर
By admin | Updated: November 16, 2015 00:42 IST