कायगाव : परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून जायकवाडीची पाणीपट्टी कपात करण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी बुधवारी मुक्तेश्वर शुगरमिल्सवर आंदोलन केले. परस्पर उसाच्या बिलांतून हजारो रुपयांची कपात झाल्याने शेतकरी संतप्त झाले असून कपात केलेल्या रक्कमा पूर्ववत खात्यात वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जायकवाडी विभागाने मुक्तेश्वर शुगरमिलला साखर आयुक्तालयाच्या सहसंचालकांचे पत्र देऊन अंमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, भेंडाळा, पखोरा, गळनिंब, भिवधानोरा आदी गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून जायकवाडी धरणातून घेतलेल्या पाण्याची पाणीपट्टी कपात करून देण्यास सांगितले होते. त्यानुसार मुक्तेश्वरने परिसरातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून परस्पर शेतकऱ्यांना न विचारता ५ ते १० हजार रुपयांची कपात केली आहे.
बुधवारी याबाबत प्रहार शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके, संदीप शेळके, किशोर गाडेकर, प्रशांत जाधव, मच्छिंद्र चव्हाण, नारायण चव्हाण, सुभाष चव्हाण, राजेंद्र चव्हाण, संतोष लांडे, अशोक चव्हाण, विठ्ठल चव्हाण आदींसह शेतकऱ्यांनी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब पटारे यांना निवेदन दिले.
जायकवाडी विभागाने प्रत्यक्ष शेतात जाऊन वसुली करावी
ज्या शेतकऱ्यांनी जायकवाडीचे पाणीच उचलले नाही, त्यांच्याकडून वसुली केल्या जात आहे. ज्यांच्याकडे पाणी उपसा करण्याची परवानगीसुद्धा नाही त्यांच्याकडून कारखान्याने वसुली केल्याच्या तक्रारी होत आहे. जायकवाडी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष वसुली करावी. आठ दिवसांत कपात केलेल्या रकमा पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
फोटो : मुक्तेश्वर कारखान्याच्या सीईओंना निवेदन देताना ऊस उत्पादक शेतकरी.