गजेंद्र देशमुख, जालनाजालना: महावितरणने औरंगाबाद व जालना जिल्ह्यात दोन महिन्यांत १२४९ वीज चोरांवर कारवाई करुन त्यांच्याकडून २५.१५ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर ७२५ वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद व जालना जिल्ह्यांचा समावेश आहे. दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याच्या तक्रारी महावितरणकडे प्राप्त झाल्या होत्या. भारतीय विद्युत कायदा २००३ कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे त्याचबरोबर कलम १३५ मध्ये मीटरमध्ये फेरफार करणे, आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणने धडक कारवाई केली. औरंगाबाद परिमंडळात एप्रिल व मे महिन्यात वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. यात ६६४ वीजचोरी करणाऱ्यांना पकडण्यात आले. या वीजचोरांवर २७ लाख ७ हजार बिलाची आकारणी करुन २० लाख ९८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यातील ३०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात मोहीम राबवून ५८५ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. ३५.४१ रुपयांचा वीज बिलाची आकारणी करुन ४.१७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ४२० वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली. याविषयी मुख्य अभियंता शिंदे म्हणाले, ग्राहकांनी वीजमीटरमध्ये छेडछाड करु नये, आकडे टाकून अनधिकृत वीज जोडणी न घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आकडे टाकून वीजचोरीजालना शहरातील अनेक भागात आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वीज गळतीसोबतच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील वीज चोरांवर कडक कारवाई करण्याचा येत आहे. थकबाकीदारांनी तात्काळ थकबाकी भरण्याचे आवाहन जालना महावितरणचे उप कार्यकारी अभियंता व्ही.आर.ढाकणे यांनी केले. जालना शहरातील नविन व जुना भागात मिळून लाखो रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा ढाकणे यांनी दिला.
२५ लाखांचा दंड वसूल
By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST