लातूर : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता महसूल विभागाच्या कर वसुलीचे संकट आहे. उपकराच्या नावाखाली गावोगाव ही वसुली केली जात आहे. एकिकडे दुष्काळ आणि दुसरीकडे करवसुली अशा दुहेरी कचाट्यात जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे. महसूल विभागाकडून जमीन महसूल वसुलीला स्थगिती असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इतर वसुली सक्तीने केली जात असल्याचे समोर आले आहे. या वसुली विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.लातूर जिल्ह्यातील जळकोट, उदगीर, देवणी, अहमदपूर आणि चाकूर या तालुक्यांतील जमिनी या माळरान आणि कोरडवाहू असल्यामुळे दुष्काळाचा पहिला फटका या भागातील शेतकऱ्यांना बसतो. मांजरा काठावरील शेती सुपीक असली, तरी पाण्याअभावी याही परिसरात मोठे हाल आहेत. सातत्याने पडणाऱ्या अल्प पावसामुळे आजचा दुष्काळ अधिक भयावह आहे. अशा दुष्काळात शासनाकडून मदत आणि मानसिक आधाराची गरज असताना महसूल विभागाच्या पथकाकडून, मंडळ अधिकारी, तलाठ्याकडून उपकराच्या नावाखाली सक्तीची वसुली केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळामुळे खरीप आणि रबीचा हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. ज्या शेतीमध्ये या हंगामावर करण्यात आलेला खर्चही निघाला नाही, अशा परिस्थितीत शेतीतील उत्पादनाचा विचार न करता महसूल विभागाच्या वतीने वेगवेगळे कर सक्तीने लादले जात आहेत. या कराच्या वसुलीसाठी गावा-गावांत महसूल विभागाचे कर्मचारी फिरत आहेत. निलंगा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये या वसुलीसाठी गेल्या चार दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने दवंडी देऊन महसूल भरण्यासंदर्भात तगादा लावला आहे. शेतकऱ्यांनी आपला कर भरावा, असे आवाहन दवंडीच्या माध्यमातून प्रशासनाने केले आहे. दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना हा कर कोठून भरायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. दुष्काळाशी दोन हात करताना दमछाक झालेल्या शेतकऱ्यांना आता जगणे मुश्किल झाले आहे. (प्रतिनिधी)
दुष्काळातही तुघलकी वसुली !
By admin | Updated: November 25, 2015 23:21 IST