औरंगाबाद : महापालिकेच्या मुख्यालयात असलेल्या रेकॉर्ड रूममधील नऊ लाखांहून अधिक जुन्या फायलींना वाळवी लागण्यास सुरुवात झाली आहे. वाळवी लागू नये म्हणून प्रशासनाकडून औषध फवारणी करण्यात येत आहे. मात्र, वॉर्ड कार्यालयांमध्ये मागील दहा वर्षांपासून रेकॉर्ड पडून आहे. या रेकॉर्डला आजपर्यंत कोणतेही औषध मारण्यात आले नाही.मनपाच्या मुख्य रेकॉर्ड रूममध्ये जागाच नसल्याने दहा वर्षांपूर्वी वॉर्ड कार्यालयांनी आपले रेकॉर्ड मुख्यालयात पाठवू नये, असा आदेश काढण्यात आला. त्यामुळे सर्व वॉर्ड कार्यालये आपले रेकॉर्ड तेथेच साठवून ठेवत आहेत. पूर्वी मालमत्ताकर आणि पाणीपट्टी वसुलीचा संपूर्ण तपशील विविध रजिस्टरमध्ये लिहिण्यात येत होता. मनपा कर्मचारी सोयीनुसार हे रेकॉर्ड गायब करीत होते. त्यामुळे मालमत्ताकर व पाणीपट्टीचे संपूर्ण रेकॉर्ड संगणकीकृत करण्यात आले. आजही सर्वच वॉर्ड कार्यालये संगणक आणि रजिस्टरचा वापर करतात. मागील दहा वर्षांमधील रेकॉर्ड वॉर्ड कार्यालयांमध्ये अक्षरश: वाईट अवस्थेत पडून आहे. याकडे वॉर्ड अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी अजिबात लक्ष देण्यास तयार नाहीत. जुने रेकॉर्ड हवे असल्यास शोधून काढण्यात येते.
वॉर्ड कार्यालयांमध्ये रेकॉर्ड धूळखात पडून
By admin | Updated: January 2, 2016 23:57 IST