लातूर : शेतात घेण्यात आलेल्या बोअरची नोंद सातबाऱ्यावर घेण्याच्या कामी रेणापूरच्या एका तलाठ्यास ६०० रूपयांची लाच स्विकारताना मंगळवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रूपचंदनगर येथील त्याच्या खाजगी कार्यालयात रंगेहात पकडले. याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.रेणापूर तालुक्यातील शेरा शिवारातील शेतात पाडण्यात आलेल्या दोन बोअरची नोंद सातबाऱ्यावर घ्यायची होती. संबंधित शेतकऱ्याने तलाठी राजेंद्र पांडुरंग संपत्ते यास नोंद करण्याची मागणी केली. मात्र तलाठी संपत्ते याने शेतकऱ्यास ६०० रूपयांची लाच मागितली. दरम्यान, ठरल्यानुसार मंगळवारी दुपारी शेतकऱ्यास रूपचंद नगर येथील स्वत:च्या खाजगी कार्यालयात तलाठ्याने बोलविले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा मारला असता, तलाठी राजेंद्र पांडुरंग संपत्ते पंचासमक्ष लाच स्विकारताना जाळ्यात सापडला. याबाबत रेणापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अॅन्टीकरप्शनचे पोलिस अधीक्षक एन. व्ही. देशमुख, पोलिस उपाधीक्षक एन. जी. अंकुशकर, सुनील नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके, विलास मलवाडे, सदानंद योगी, राजेंद्र वाघमारे, विष्णू गुंडरे, दत्ता विभुते, धर्मपाल गुट्टे, शैलेश सुडे, धारेकर यांनी परिश्रम घेतले. प्रकरणाचा पुढील तपास पोनि. अभिमन्यू साळुंके करीत आहेत. (प्रतिनिधी)
६०० रुपयांची लाच स्वीकारताना रेणापूरचा तलाठी जाळ्यात
By admin | Updated: July 23, 2014 00:31 IST