उस्मानाबाद : सर्वसामान्यांसाठी हितावह मानल्या जाणार्या अन्न सुरक्षा योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेसंदर्भात नागरिकांच्या असलेल्या तक्रारी दूर करण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने पुरवठा विभागात जिल्हा तक्रारण निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडे गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३११ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी १७० तक्रारीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक ५ जुलै २०१३ पासून लागू केले आहे. तर जिल्ह्यातील १ फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने लाभार्थी निवडीची प्रक्रिया हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो गॅ्रम धान्य मिळणार आहे. यामध्ये तीन रुपये किलो तांदूळ, दोन रुपये किलो गहू असे विविध धान्य मिळत आहेत.या शिवाय अन्य सवलती दिल्या जात आहेत. या योजनेबाबत नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वितरित होणार्या अन्नधान्याबाबत किंवा इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही समिती कार्यरत आहे. अन्न सुरक्षा विधेयक सुरु झाल्यापासून जिल्ह्यात ३११ तक्रारी या समितीकडे दाखल झाल्या आहेत. त्यापैैकी १८१ तक्रारीची तपासणी करण्यात येऊन १७० तक्रारीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली तर १४१ तक्रारी शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
साडेतीन महिन्यांत ३११ तक्रारी प्राप्त
By admin | Updated: May 20, 2014 01:13 IST