बीड : दिवसभर निरभ्र आभाळ अन रात्री टपुरं चांदण यामुळे शेतऱ्यांची झोप उडाली आहे. उन्हाळ्यातही पावसळ्याचे दिवस अनुभवयास मिळत आहे. पावसाने तर दगाबाजी केलीच आहे शिवाय उभं वारं सुटल्याने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं जातयं. निसर्गाने शेतकऱ्यांची जणू काही थट्टाच चालवली आहे. जिल्ह्यात सध्या दुबाराचा पेरा अनिवार्यंच झाला आहे. मात्र त्याकरिता तरी पावसाने हजेरी लावणे गरजेचे आहे. दिवस उगवताच स्वच्छ आभाळ व रखरखते ऊन पडत आहे. जमिनीतील ओल तर उडालीच आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी केविलवाणी कृत्रिम प्रयोग करू लागला आहे. काही भागात ओल टिकवून ठेवण्यासाठी ठिबकसिंचनचा वापर केला जात आहे. तर काही ठिकाणी चक्क टँकरद्वारे पिकांना पाणीपुरवठा केला जात आहे तर काही ठिकाणी उन्हापासून बचावासाठी कांद्याच्या रोपांवर कपड्याचे आच्छादन केले आहे. महिन्याभरापासून पावसाने दडी दिली आहे. आकाशात ढग भरून येताच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होत आहेत. मात्र त्यांच्या नशिबी केवळ निराशाच पडली आहे. गुरूवारी रात्री व शुक्रवारी सकाळी केज, अंबाजोगाई तालुक्यातील काही मंडळात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्याही काही मिनीटांपुरत्या तर शुक्रवारी सकाळी बीड शहर व परिसरात दिवसाची सुरवात पावसाने केली खरी मात्र, ती पिकांकरीता उपायकारक न ठरता अपायकारक ठरली आहे. झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. (प्रतिनिधी)
पाऊस गायब; पिकांची वाढ खुंटली
By admin | Updated: July 12, 2015 00:17 IST