राजकुमार जोंधळे , लातूरशहरासह जिल्हाभरात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आता नागरिकांसह सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाणपोर्इंचा घसाही गेल्या अनेक दिवसांपासून कोरडा पडला आहे. या भयावह दुष्काळात माणुसकीच हरवत चालली आहे. दर उन्हाळ््यात जागोजागी दिसणारी सार्वजनिक पाणपोर्इंची संख्या यंदाच्या दुष्काळात मात्र ९० टक्क्यांनी घटली आहे. याची दाहकता रस्त्यावरच्या सर्वसामान्य माणसांना सहन करावी लागत आहे. ज्यांची विकतच्या पाण्यावर तहान भागविण्याची कुवत आहे, अशांना सर्वसामान्यांच्या घशाची कोरड कळणार कशी..?त्यासाठी मन संवेदनशील असावे लागते. हीच संवेदना आता दुष्काळाच्या दाहकतेत करपून चाललीय..!शहरातील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या पाणपोई, जलकुंभाची ‘लोकमत’ने सोमवारी पाहणी केली. या पाहणीतून दुष्काळाची दाहकता आणि वास्तव परिस्थिती समोर आली असून, काही ठिकाणी सार्वजनिक पाणपोर्इंचे उदघाटन झाले मात्र उदघाटनानंतर तीन-चार दिवसांनी याच पाणपोईचा घसा कोरडा पडला आहे. याकडे ज्यांनी हौसेने पाणपोई सुरु त्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. तर काहींनी माणुसकीचा धर्म म्हणून पाणपाई नेटाने सुरु ठेवली आहे. सकाळ-संध्याकाळ पाण्याची साठवण केली जात आहे. तर अनेकांनी वर्तमानपत्रातील छायाचित्रांपुरतीच पाणपोई सुरु केली आहे. दुष्काळाच्या नावाखाली प्रसिध्दीची हौस भागवून घेणाऱ्यांचीही कमतरता आजघडीला कमी नाही. अशा परिस्थितीत आपल्यातले माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी पदरमोड करुन काहीजण तहानलेल्यांची तहान भागविण्याचे काम करत आहेत.
सार्वजनिक पाणपोर्इंचा घसा कोरडा..!
By admin | Updated: March 22, 2016 01:18 IST