नांदेड :यंदा भुईमुगावर करप्या रोगाचा परिणाम उत्पनावर झाला असून उत्पादनात पन्नास टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे भुईमूग उत्पादक शेतकरी चांगलचा अडचणीत सापडला आहे. यंदा जिल्ह्यात बर्यापैकी शेतकर्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली होती. मात्र भुईमुगावर करप्या रोगाने आक्रमण केल्यामुळे अळीने पाने खावून टाकली. यामुळे वाढ खुंटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली. सध्या नवा मोंढा बाजारात तुरळक स्वरुपात भुईमूगाच्या शेंगाची आवक सुरु आहे. मात्र भाव प्रतिक्विंटल ३५०० ते ३६०० रुपयापर्यंतच मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाचा हमीभाव ३७०० रुपये प्रतिक्विंटल असताना बाजारात हमीभावापेक्षाही कमी दराने खरेदी सुरु आहे. यामुळे शासानाची आधारभूत किंमत केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. यासाठी शासनाने आधारभूत खरेदी किमतीवर खरेदी करणे गरजेचे झाले आहे. शेतकर्यांनी ४५०० ते ५००० रुपये क्विंटल याप्रमाणे बियाणे घेवून पेरणी केली. यासाठी खत, फवारणी याचा खर्च काढल्यास शेतकर्यांच्या हातात दमडीही उरत नाही. एकरी केवळ ३ ते ४ क्विंटल उतारा येत असल्याचे शेतकरी भारत कल्याणकर, नागोराव कदम यांनी सांगितले. लागवडीसाठी टाकलेला खर्चही निघेनासा झाला आहे. उत्पन्नात घट झाल्याने मोंढा बाजारात म्हणावी तेवढी आवकही नाही. गतवर्षी मात्र मोंंढा बाजारात भुईमुगाच्या शेंगांना ४८०० ते ५००० रुपयापर्यंत भाव मिळाला होता. (प्रतिनिधी)
भुईमुगाचे उत्पादन अर्ध्यावर
By admin | Updated: May 8, 2014 00:45 IST