जालना : खरीप हंगामानंतर रबी हंगामात तरी काही कसर भरून निघेल हा शेतकऱ्यांचा अंदाजही फोल ठरण्याची भीती आहे. महावितरणच्या दोन्ही विभाग मिळून दीडशेपेक्षा अधिक रोहित्रांना दुरूस्तीची प्रतीक्षा आहे. महावितरणचा कारभारही यासाठी कारणीभूत ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.जालना जिल्ह्यात महावितरणच्या विभाग एक व दोन अंतर्गत वीजपुरवठा होतो. विभाग एक अंतर्गत जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद तर विभाग दोन अंतर्गत मंठा, परतूर, घनसावंगी अंबड या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील शेकडो रोहित्र जळाले आहेत. विजेचा कमी दाब व तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे.याचा परिणाम पिकांना पाणी देण्यावर होत आहे. रबी हंगामातील गहू, हरभरा तसेच इतर पिकांना पाणी देण्याची नितांत गरज आहे. परंतु रोहित्र जळाल्याने पिके धोक्यात आली आहेत. विभाग एक अंतर्गत १०० केव्हीएचे ३८ तर ६३ केव्हीएचे २८ रोहित्रांची दुरूस्ती बाकी असून, ती लवकरच दुरूस्त होतील असा अंदाज विभाग एकचे कार्यकारी अभियंता भालशंकर यांनी सांगितले. तर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता पवार म्हणाले की आमच्या विभागात १०० केव्हीएचे १७ तर ६३ चे २२ रोहित्रांची दुरूस्ती झालेली नाही. (वार्ताहर)
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोहित्र मिळण्यास येताहेत अडचणी
By admin | Updated: November 17, 2015 00:28 IST