हिंगोली : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या ६७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्याच्या अखेरच्या दिवशी २५ मे रोजी इंटरनेट सर्व्हर बंद पडल्याने याबाबतची माहिती पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात अडचण आली. येथील संत नामदेव कवायत मैदानावर ६ जूनपासून पोलिस शिपाई भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. त्यासाठी शनिवारपर्यंत साधारणत: १ हजार ५०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात २५० महिला उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दिली. या भरतीत अनुकंपाच्या सात जागाही भरण्यात येणार आहेत. ६ जूनपासून सुरू होणार्या प्रक्रियेत सुरूवातीला कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर शारीरिक चाचणी घेवून एसआरपीएफच्या मैदानावर ५ व ३ कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. दरम्यान, सर्व्हर बंद पडल्याने पोलिस यंत्रणेला एकूण किती अर्ज आले आहेत, याची माहिती मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)
पोलिस भरतीचे सर्व्हर बंद पडल्याने अडचणी
By admin | Updated: May 26, 2014 00:56 IST