औरंगाबाद : अवैध बांधकाम ठरवून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दीड-दोन वर्षांपूर्वी चिकलठाणा येथील गट क्रमांक ४०८ मधील ज्या बहुचर्चित पोल्ट्री फॉर्मवर हातोडा चालविला होता, त्याच बांधकामाला नियमानुकूल करीत नगररचना विभागाने भोगवटा प्रमाणपत्र बहाल केल्याचे गुरुवारी स्थायी समितीसमोर उघड झाले आणि पालिकेचे वातावरण पुन्हा तापले. पालिकेचे उपायुक्त व प्रशासन अधिकारी शिवाजी झनझन यांना तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती विजय वाघचौरे यांनी दिले. नगरसेवक संजय चौधरी यांनी गुरुवारी पुन्हा योगेश विठ्ठलभाई जव्हेरी यांच्या पोल्ट्री फार्मचा मुद्दा उपस्थित केला. ज्या बांधकामाला पालिकेने अनधिकृत ठरवून पाडले होते, त्या पोल्ट्री फार्मला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले काय, ते देण्याची पद्धत, नियम काय, अपूर्ण बांधकामाला संपूर्ण भोगवटा दिले जाते काय, आदी प्रश्न विचारताना चौधरी यांनी नगररचना विभागाचे अधिकारी आर. एन. संधा यांना अपशब्दही काढले. चौधरी यांचे ते शब्द सभापतींनी नंतर कामकाजातून वगळले. संधा यांनी सांगितले की, पुण्याच्या नगररचना संचालकांच्या पत्रावरून सदर पोल्ट्री फार्मला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. संधा यांच्या या खुलाशावर नगरसेवक काशीनाथ कोकाटे, त्र्यंबक तुपे, मीर हिदायत अली, अज्जूभाई आदी सर्वच संतापले व त्यांनी अनेक प्रश्न विचारून संधा यांना घाम फोडला. नियमानुसार परवानगी घेऊन बांधकाम पूर्ण झालेले अनेक मालमत्ताधारक भोगवटासाठी पालिकेत चकरा मारून त्रस्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला अधिकारी काही विशिष्टप्रकरणी विशेष लक्ष देऊन ते काम करतात कसे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सर्वच नगरसेवकांनी लावून धरली.
अगोदर चालविला हातोडा, नंतर दिले भोगवटा प्रमाणपत्र
By admin | Updated: January 23, 2015 00:57 IST