पंढरपुरात हरवलेले पाकिट पोस्टाने घरपोचमोहन साखरे, नंदागौळकाळाच्या ओघात नैतिकता व प्रामाणिकपणाची उदाहरणे दुर्मिळ झाली आहेत. मात्र, आजही प्रामाणिक लोक असल्याचे उदाहरण पहावयास मिळत आहे. आषाढी वारीत लाखो लोकांच्या गर्दीत हरवलेले पाकिट तब्बल महिनाभरानंतर भाविकाला अनपेक्षितपणे त्याच्या पत्त्यावर मिळाले. कर्मचाऱ्याने प्रामाणिक उद्देश ठेवून आजच्या काळात आदर्श घडावा असे उदाहरण समोर ठेवले आहे.पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या रमेश गोडसे या कर्मचाऱ्याने मंदिर समितीचा गौरव वाढवणारे कार्य केले आहे. त्याचे झाले असे, परळीपासून जवळच असलेल्या उखळी बु. येथील भाविक सुरेंद्र भास्करराव जोशी हे आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेले होते. मंदिरात विठूरायाचे दर्शन झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा करण्यासाठी निघालेले असताना त्यांच्या खिशातील पाकिट गायब झाल्याचे कळले. पाकिटात काही रक्कम, आधारकार्डची दुय्यम प्रत व काही पावत्या आदी साहित्य होते. एवढ्या गर्दीत पाकिट कोठे शोधणार ? असे वाटून पाकिट गेले असल्याचा ठाम विचार त्यांनी केला व विषय सोडून दिला. काही दिवसानंतर मंदिर समितीचे पार्सल अनपेक्षितपणे त्यांच्या पत्त्यावर आले. सर्वांना प्रसादाचे पार्सल असल्याचे वाटले. मात्र, ध्यानीमनी नसताना हरवलेले पाकिट असल्याचे दिसले व आश्चर्याचा सुखद धक्का बसला. विशेष म्हणजे पाकिटातील सर्व साहित्य जशास तसे होते. शिवाय पोस्टेजच्या खर्चासाठी लागणारी रक्कम पाकिटातून न काढता स्वखर्चाने करण्यात आली होती. पाकिटचे पार्सल मिळाल्यनांतर फोन करावा, अशी सूचनाही चिठ्ठीद्वारे करण्यात आली होती. संपर्क साधला असता प्रामाणिकपणा दाखविणारा माणूस विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचा कर्मचारी असल्याचे समजले.
पंढरपुरात हरवलेले पाकिट पोस्टाने घरपोच
By admin | Updated: August 23, 2015 00:01 IST