अकोला: पोलीस दलातील ५0 रिक्त जागांसाठी अकोल्यात राबविण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेमध्ये 'डमी' उमेदवारांकडून पेपर लिहून घेतल्याप्रकरणी अकोला पोलिसांनी आणखी चार जणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्यापैकी दोघे औरंगाबाद येथील, तर दोघे जालना येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.पोलीस दलातील ५0 रिक्त जागांसाठी २९ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत अकोल्यात शारीरिक चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पात्र ठरलेल्या एक हजारांवर उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन १६ एप्रिल रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या ५0 उमेदवारांना पोलीस दलाचे नियुक्तिपत्र देण्यापूर्वी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी या उमेदवारांची ऑनलाइन अर्ज सादर करण्यापासून ते लेखी परीक्षेपर्यंतच्या प्रक्रियेची पडताळणी केली. या पडताळणीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी येथील रहिवासी राजू रामलाल पहुरे (२४) या उमेदवाराने शारीरिक चाचणी स्वत: दिल्याचे; मात्र लेखी परीक्षेला त्याच्याऐवजी जालना जिल्ह्यातील निहालसिंहवाडी येथील रहिवासी विठ्ठल त्र्यंबक सिसोदे (२२) हा बसला असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांमध्ये कल्याणसिंह अंबरसिंह बमनावत व संदीप इंदर जाधव यांनी मध्यस्थी केल्याचे समोर आले. या चौघांच्या चौकशीनंतर अकोला पोलिसांनी आणखी चार जणांना संशयावरून ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या नऊवर गेली असून, आणखी काही चेहरे समोर येण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री ताब्यात घेतलेल्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील चार जणांची कसून चौकशी करण्यात येत असून, त्यांच्याकडून आणखी काही नावे समोर येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलीस भरती प्रक्रिया; आरोपींची संख्या नऊवर.
By admin | Updated: May 5, 2016 03:17 IST