सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील मनाठा गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी गेली २५ वर्षांपासून प्रलंबित आहे़ या मंजुरीसाठी वेगवेगळ्या नियमांचे ग्रहणच लागले की काय, असे ग्रामस्थ विचारत आहेत़ मनाठा हे गाव नांदेड-नागपूर या महामार्गापासून ५ कि़मी़ दूर डोंगरात वसलेले आहे़ परिसर कोरडवाहू असून सिंचनाची कोणतीही व्यवस्था नाही़ त्यामुळे शेती असूनही उत्पन्न अत्यल्प, उद्योगधंद्याचा कोसोदूर पत्ता नाही़ साक्षरतेचे प्रमाण ८० टक्के आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जी कागदपत्रे लागतात ती या गावाने वेळोवेळी पूर्ण केली़ जि़प़ सदस्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत या गावासाठी शिफारशी गेल्याचे बोलले जाते़ परंतु २५ वर्षांपासून या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र मिळाले नाही, ही शोकांतिका आहे़ निमगावला प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते़ त्या गावासाठी रस्ता नाही़ आजूबाजूला सहा-सात गावचे तेथील रूग्ण या दवाखान्यात येण्याऐवजी त्यांना अर्धापूर व नांदेड सोयीचे वाटते़ बरडशेवाळा येथेही हिच परिस्थिती आहे़ बरडशेवाळ्याला दाखविण्यापेक्षा हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात लोक धाव घेतात़ या दवाखान्याची खरी गरज मनाठा या गावाला आहे़ परंतु जाणूनबुजून या गावाकडे दुर्लक्ष करण्यात आले़ जि़प़ सदस्य नरेंद्र मालीवाल, डिगांबर साखरे, गंगाधर पाटील यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही़तत्कालीन आ़ सुभाष वानखेडे यांनी येथील दवाखाना बरडशेवाळा येथे गेल्यामुळे उपोषणही केले होते़ परंतु त्यावेळचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा कार्यकर्ता बरडशेवाळा येथील रहिवासी इजळकर असल्यामुळे तेथे दवाखाना शिफ्ट केला़ वानखेडेंची समज त्यांनी काढली़ त्यानंतरही ग्रामस्थांची मागणी थांबली नाही़ प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक लोकप्रतिनिधीला ग्रामस्थांनी फक्त दवाखानाच मागितला़ आता सर्व मदार विद्यमान आ़माधवराव पाटील जवळगावकर यांच्यावर आहे़ त्यांनी तसा शब्दही दिला़ हदगाव तालुक्यात मनाठा व निवघा या दोन गावांसाठी पीएससी केंद्र सुरू होणारच, परंतु त्यांचा कार्यकाळही अवघ्या तीन-चार महिन्यांवर येवून ठेपला़ परंतु मंजुरी मिळाली नाही़ यामुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येण्यासाठी कोणता नवस करावा लागेल, असे ग्रामस्थ म्हणतात़ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे़ परंतु शासन लक्ष द्यायला तयार नाही़ आमची मागणी सुरूच आहे - सुरेखा बोडखे, जि़प़सदस्या़ दवाखाना देऊ-देऊ असे वारंवार बोलले जाते़ परंतु जोपर्यंत दवाखाना गावात येत नाही, तोपर्यंत खरे कसे वाटणार - नरेंद्र मालीवाल, माजी जि़प़सदस्य़ दवाखाना गावासाठी आवश्यक आहे़ मागणी सातत्याने सुरू आहे़ लोकसभेत बदल झाला, लोकांच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर त्याचा फटका विधानसभेत बसू शकतो - मारोतराव पाटील, मार्केट कमिटी संचालक, हदगाव़ २५ वर्षांपासून आम्ही मागणी करीत आहोत़ परंतु अद्याप तरी यश आले नाही - वच्छला वाठोरे, पं़स़ सदस्या़
२५ वर्षांपासून प्रलंबित
By admin | Updated: May 25, 2014 01:12 IST