हिंगोली : जुन्या भांडणावरून युवकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने दोन आरोपींना प्रत्येकी ७०० रुपये दंड सुनावला आहे. कळमनुरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. जी. सावंत यांनी १३ मे रोजी हा निकाल दिला. कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे २० मार्च २०१३ रोजी रात्री ११.३० वाजता गावातील दत्त मंदिरात कीर्तन चालू असताना गजानन नथूजी सुरोशे (वय ३४), गजानन रामराव काकडे (वय ३३) हे दोघे दारू पिऊन त्या ठिकाणी गेले. बालाजी दत्तराव सुरोशे (२१) यास ‘तू गावात राजकारण करायला का?’ असे म्हणून शिवीगाळ करीत त्याला मंदिराशेजारील पानटपरीवर ढकलून दिले. त्यामुळे बालाजीच्या डोक्याला जखम झाली. यावेळी त्या दोघांनी बालाजीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. गावातील लोकांनी हे भांडण सोडविले. याप्रकरणी बालाजी सुरोशे याने दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीविरूद्ध ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन तपासिक अंमलदार पोलिस जमादार जगदीपसिंह परदेशी यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक केली. त्यांच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला कळमनुरी न्यायालयात चालला. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश के. जी. सावंत यांनी आरोपी गजानन सुरोशे, गजानन काकडे या दोघांना कलम ३२३ भादंवी अन्वये दोषी ग्राह्य धरून प्रत्येकी ७०० रुपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. गजानन जगताप यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
मारहाणप्रकरणी दोन आरोपींना दंड
By admin | Updated: May 14, 2014 23:54 IST