बीड : पाव्हणं...उघड्यावर जाऊन घाण करू नका. शौचालय बांधून घ्या, असे आवाहन करीत सोमवारी पहाटे पाडळसिंगी (ता. गेवराई) येथे सीईओ नामदेव ननावरे यांनी मशाल फेरी काढली. खुद्द सीईओ भल्या पहाटे गावात धडकल्यामुळे लोटा घेऊन निघणाऱ्यांची पुरती भंबेरी उडाली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सीईओ ननावरे यांनी पाणंदमुक्ती मोहीम गतिमान केली आहे. वर्षाकाठी ७० हजार शौचालय बांधण्याचे लक्ष्य आहे. त्यानुसार स्वच्छतेचा संदेश अनोख्या पध्दतीने देण्यासाठी सोमवारी पहाटे येथे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. साडेपाच वाजता सीईओ गावात धडकले. सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह २०० तरूणांच्या मदतीने त्यांनी गावातून मशाल फेरी काढली. पहाटेच्या वेळी शौचासाठी घराबाहेर निघालेल्या ग्रामस्थांना ताई, दादा उघड्यावर बसू नका. शौचालय बांधून घ्या, अशी विनवणी केली. त्यानंतर गावातील चावडीजवळ त्यांनी पहाटेच बैठक घेऊन घरोघर शौचालय बांधण्याचे आवाहन केले. ३१ मार्चपूर्वी संपूर्ण गाव पाणंदमुक्त करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी घेतला. (प्रतिनिधी)
पाव्हणं, उघड्यावर जाणं बरं हाई का ?
By admin | Updated: February 10, 2015 00:31 IST