आष्टी : राज्याचे माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते अहमदनगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे सकाळी ११ वाजता इमर्जन्सी लँड करावे लागले.माजी खा. अंकुशराव टोपे यांच्या निधनामुळे जालना जिल्ह्यातील अंबड येथे आ. राजेश टोपे यांचे सांत्वन करण्यासाठी कदम हे हेलिकॉप्टरमधून गेले होते. तेथून ते अकलूज (जि. सोलापूर) येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भावाचे निधन झाल्यामुळे सांत्वन करण्यासाठी निघाले होते. त्यांचे हेलिकॉप्टर आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथे आले तेव्हा त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यामुळे १५ मिनिेटे खोळंबा झाला. यावेळी पतंगराव कदम हेलिकॉप्टरमधून खाली उतरले. तांत्रिक दुरुस्ती झाल्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा आकाशात झेप घेतली. यावेळी जामखेड येथील पोलीस तेथे दाखल झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना याची माहिती कळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आष्टी ठाण्याचे पोलीसही चिंचपूरकडे रवाना झाले; परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच हेलिकॉप्टर अकलूजकडे मार्गस्थ झाले होते. या वृत्ताला आष्टी ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दुजोरा दिला.
पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग’
By admin | Updated: April 16, 2016 00:10 IST