माजलगांव : माजलगाव धरणाची पाणीपातळी अत्यंत खालावल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ नये म्हणून पैठणच्या जायकवाडी धरणातून जवळपास २ टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे बीड, माजलगाव शहरासह ११ खेड्यांना पिण्यासाठी सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्हा व माजलगाव धरण परिसरात यावर्षी अत्यल्प पाउस झाल्याने धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली असल्याने या उन्हाळयात या धरणाचे पाणी पिण्यासाठी पुरेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. माजलगाव धरण भरण्यासाठी ४३१.८० मी. एवढे पाणी आवश्यक असताना पावसाळा संपल्यानंतरही या धरणाच्या जोत्यालादेखील पाणी आले नाही व सध्या या धरणाची पाणी पातळी ९ मीटरने कमी झाली असून, शुक्र वारी ही पातळी ४२३.६६ मी. एवढी होती, तर हीच पातळी १० जानेवारी रोजी ४२३.२१ मी. एवढी होती. १० जानेवारी रोजी पैठण धरणातून १.७६ टी.एम.सी. एवढे पाणी माजलगाव धरणात कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. हे पाणी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून धरणात येणे सुरू असून, आणखी दोन दिवस हे पाणी सुरु राहण्याची शक्यता आहे. धरणाच्या आजूबाजूला असलेले शेतकरी अवैध उपसा करून आपल्या पिकांना पाणी देतात. त्यामुळे या धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असतो. जर अशाच प्रकारे उपसा चालू राहिला तर हेच पाणी दोन महिने देखील पुरणार नाही. त्यामुळे या मोटारी बंद करून प्रशासनाने यावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. (वार्ताहर)
पैठणचे पाणी माजलगावला
By admin | Updated: February 13, 2016 23:53 IST