पैठण : जायकवाडी धरणातून पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीस गळती लागली असून ही दुरुस्ती करण्यासाठी दि. १७ व १८ रोजी पैठण शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे न.प. प्रशासनाने घोषित केले आहे.शहरात गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. पाण्यासाठी विविध भागांतून नागरिकांची ओरड सुरू झाली होती. दरम्यान, परवा औरंगाबाद रोडवर दूध शीतकरण केंद्राजवळ मुख्य जलवाहिनीस मोठे भगदाड पडल्याने तेथून लाखो लिटर पाणी वाया जाण्यास प्रारंभ झाला. परिणामी शहरातील जलकुंभ क्षमतेने भरत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम नगरपालिकेने हाती घेतल्याने उद्या मंगळवार व बुधवार रोजी शहरास पाणीपुरवठा होणार नाही, असे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले आहे. मुख्य जलवाहिनीची झालेली दुरवस्था व शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरास पर्यायी जलवाहिनीच तारू शकते, यामुळे जायकवाडी ते पैठण समांतर जलवाहिनीची मागणी पुढे आली आहे.जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात येईल, तसेच जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती सुरू असून शहरास शुद्ध पाणीपुरवठा होईल, असे नगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)जलवाहिनी जीर्ण झालीपैठण शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २००३ ला ही जलवाहिनी नगर परिषदेस हस्तांतरित केली आहे. ही जलवाहिनी सिमेंटची असून ती काळ्या मातीत टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी टाकताना परिसरातील काळ्या मातीचे गुणधर्म लक्षात घेऊन जलवाहिनीखाली काँक्रीट बेड करणे गरजेचे होते; परंतु तसे न करण्यात आल्याने प्रत्येक उन्हाळ्यात जमिनीस तडे जाऊन सिमेंटच्या जलवाहिनीला गळती लागते. काळ्या मातीचे होणारे आकुंचन व प्रसरण हे जलवाहिनीस घातक ठरत आहे.
पैठणमध्ये आज-उद्या निर्जळी
By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST