औरंगाबाद : उन्हाळ्याच्या शेवटी मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती खूपच भीषण झाली आहे. विभागातील मोठ्या धरणांमध्ये सध्या केवळ २२ दलघमी इतकाच जिवंत साठा शिल्लक आहे. जायकवाडीसह इतर आठ मोठ्या धरणांमधील जिवंत साठा केव्हाच संपला असून, आता या धरणांमधील मृतसाठ्यातील पाण्यावरच विभागातील अनेक शहरांची तहान भागविली जात आहे.मराठवाड्यात मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे विभागातील धरणांमध्ये पुरेसा साठा होऊ शकला नव्हता. परिणामी यंदा जानेवारीपासून पाणीटंचाईचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली. मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण यंदा २६ मार्च रोजीच मृतसाठ्यात गेले. तेव्हापासून या धरणातील मृतसाठ्यातून औरंगाबाद, जालना, गेवराई आदी प्रमुख शहरांसह सुमारे अडीचशे गावांची तहान भागविली जात आहे. तसेच औद्योगिक वसाहतींसाठी मृतसाठ्यातूनच पाणी वापर सुरू आहे. दुसरीकडे येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न मनार, विष्णूपुरी या धरणांमधील जिवंत साठा संपला आहे. सध्या केवळ निम्न दुधना आणि पेनगंगा या दोन धरणांच्या जिवंत साठ्यात अवघे २२ दलघमी एवढे पाणी शिल्लक आहे. आठवडाभरात हे पाणीही संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत मराठवाड्यातील सर्व मोठ्या धरणांमधील जिवंत साठा शून्यावर येणार आहे. दरम्यान, मृतसाठ्यातून आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वापर झाला आहे. एकट्या जायकवाडी धरणातून आतापर्यंत सुमारे २२८ दलघमी पाणी उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात आधी मृतसाठ्याची पातळी भरून जिवंत साठ्यात पाणी साचण्यासाठी बराच अवधी लागणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये फक्त २२ दलघमी पाणी
By admin | Updated: June 9, 2016 23:54 IST