औरंगाबाद : महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी पैशांसाठी काय करतील याचा नेम नाही. एकाच व्यक्तीचे दोन मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या जमिनीसाठी हा डाव काही मंडळींनी रचला. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी हा डाव मोडून काढला. दोषींवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले.या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, सातारा परिसरातील शेख अमीर मद्दू पटेल यांचा मृत्यू १९८० मध्ये झाला. त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र महापालिकेतून काढले. १९८७ मध्ये परत मनपाने शेख अमीर मद्दू पटेल मरण पावल्याचे प्रमाणपत्र दिले.हे प्रमाणपत्र १९८८ मध्ये देण्यात आले. एका व्यक्तीचे दोन प्रमाणपत्र देताना मनपाने कोणत्याही प्रकारे चौकशी रेकॉर्डची तपासणी केली नाही. नंतर काही वर्षांनंतर शेख अमीर यांच्या मृत्यू प्रमाणपत्राचा वाद बराच उफाळून आला.शेख यांच्या मुलांनी दावा केला की, आमच्या वडिलांचे निधन १९८० मध्ये झाले आहे. त्यांनी सातारा भागातील ४ एकर जमीन कोणालाही विकलेली नाही.सय्यद शहानूर सय्यद चाँद यांनी आमच्या वडिलांच्या नावावर दुसरा व्यक्ती उभा करून जमीन नावावर करून घेतल्याचा आरोप केला. या आरोपामुळे जमीन खरेदी करणारे सय्यद शहानूर अस्वस्थ झाले. त्यांनी शेख अमीर जिवंत असताना त्यांच्यासोबत नियमांच्या चौकटीत व्यवहार केला.वास्तविक पाहता अमीर यांचा मृत्यू १९८७ मध्ये झाला. जमीन हडप करण्याच्या उद्देशाने अमीर यांची मुले हा खेळ खेळत असल्याची शंका आली.
एका व्यक्तीचा दोनदा मृत्यू!
By admin | Updated: August 3, 2016 00:17 IST