परतूर : एटीएमचा चौदा अंकी कोड घेऊन भामट्यांनी एका शेतकऱ्याच्या खात्यावरून या कोडच्या आधारे विविध वस्तूंची खरेदी करत ९९ हजार रुपयांना गंडविले. मात्र याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला.‘मी बँक मॅनेजर बोलतो, आपले एटीएम बंद पडले आहे. कार्डवरील चौदा अंकी कोड सांगा’ असा भ्रमणध्वनी दत्तात्रय कुंडलिकराव ढगे (रा. वरखेड ता. पाथरी जि. परभणी ) यांना १९ जानेवारी २०१५ रोजी आला. यावरून ढगे यांनी सदर इसमाला हा चौदा अंकी कोड दिला. पुढे या कोडचा वापर करून स्टेट बँक आॅफ इंडिया परतूर शाखेतील खात्यावर असलेल्या ९९ हजाराची आॅनलाईन विविध कंपन्याचे समान खरेदी करून हे पैसे काढण्यात आले. नंतर या बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी ढगे यांना फोन करून सांगितले की, तुमच्या खात्यावरील पैसे कमी झाले. बँकेत येऊन भेटा. यावरून ढगे बँकेत आले असता त्यांना आपल्या खात्यावरून उसाचे ५६ हजार रुपये व कपाशीचे ४४ हजार ८०० रुपयांपैकी ९९ हजार गायब झाल्याचे लक्षात आले. याबाबत ढगे यांनी या खात्यावरील व्यवहाराची माहिती मागितली. शाखा व्यवस्थापकाने ती देण्यास टाळाटाळ केला असल्याचा आरोप ढगे यांनी केला. तसेच या प्रकाराची तक्रार देण्यास परतूर पोलिसात गेलो असता पोलिसांनीही तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे सांगून शेवटी पोलिस अधीक्षकांकडे आपण धाव घेतली व नंतर आपली तक्रार घेण्यात आली असे ढगे म्हणाले. याप्रकरणी परतूर पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)
एटीएमच्या क्रमांकाद्वारे शेतकऱ्याला गंडविले
By admin | Updated: March 17, 2015 00:40 IST