ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 16 - शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या विचारात शेतक-यांच्या प्रश्नांवर मागील ३० वर्षांत आंदोलन केलेल्या शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक सुभेदारी विश्रामगृहात शुक्रवारी पार झाली. या बैठकीत शेतक-यांचा लढा अधिक प्रखर करण्यासाठी सर्वानुमते किसान शिखर मंचाची स्थापना करण्यात आली आहे.राज्यात शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी शेतकरी नेत्यांची बैठक माजी आमदार शंकर धोंडगे यांनी बोलावली होती. या बैठकीत अनेकांनी नुकत्याच झालेल्या शेतकरी संपाबाबत सुकाणू समिती आणि सरकार यांच्यातील सरसकट कर्जमाफी व इतर मागण्याबाबत झालेल्या निर्णयावर आक्षेप घेतला. सरकारकडून शेतक-यांची फसवणूक होत असल्याची भावनाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे आगामी काळात शेतक-यांचा लढा अधिक परिणामकारक करण्यासाठी विभागवार मेळावे आणि मुख्यमंत्र्यांशी भेटून सविस्तर निवेदन देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. संपूर्ण कर्जमाफीची घोषणा फसवी असून, प्रत्यक्षात लाभ मिळण्यास उशीर लागणार असल्याचेही अनेकांनी सांगितले. यामुळे आगामी काळात एक नव्या आंदोलनाची घोषणा करून कोणत्याही परिस्थितीत शेतक-यांच्या पदरी कर्जमुक्तीसह इतर मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. याविषयी निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, माजी विधानसभा उपसभापती मोरेश्वर टेंभुर्डे, माजी आमदार सरोजाताई काशीकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनील धनवट, डॉ. गिरिधर पाटील, माजी अध्यक्ष किशोर माधकर, सुरेखाताई ठाकरे, ललीत बहाळे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, वामनराव जाधव, डॉ. मानवेंद्र काचोळे, गोविंद जोशी, कॉ. अण्णासाहेब कदम, गजानन अहमदाबादकर, बद्रीनाथ देवकर, समाधान कृपाळे, पुंडलिकराव उकिर्डे, दत्ता पवार, संतोष देशमुख, अॅड. प्रकाश पाटील, संजय कोल्हे, संजय सोळंके, बाबूराव गोल्डे, सीमा नरवडे, जयश्री पाटील, हसन देशमुख, लक्ष्मणराव वगे, गणपतराव हंगरगेकर, मनोज तायडे आदी उपस्थित होते.
आता शेतक-यांसाठी किसान शिखर मंच करणार आंदोलन
By admin | Updated: June 16, 2017 22:11 IST