शिरूर अनंतपाळ : नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या कालावधीमध्ये एकवाक्यता नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याने नॉन-क्रिमीलेअरचा कालावधी राज्यात समान असावा, यासाठी शासनाने विशेष सूचना देऊन शासन निर्णय दिला असल्याने विद्यार्थी, पालकांना या प्रमाणपत्रांसाठी प्रत्येक वर्षी तहसील कार्यालयात खेटे घालण्याची गरज नसून, तीन वर्षांचे उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असेल, तर तीन वर्षांसाठी नॉन-क्रिमीलेअरचे एकच प्रमाणपत्र वैध राहणार आहे. उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विशिष्ट जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या कागदपत्रासोबत नॉन क्रिमीलेअरचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून सात दिवसांचा कालावधी दिला जातो. परंतु, प्रत्यक्षात प्रमाणपत्र हातात पडण्यासाठी कित्येक दिवसांचा कालावधी निघून जातो. शिवाय, पालकांना आणि विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रासाठी नाहक खेटे घालावे लागतात. यासाठी शासनाने निर्णय दिला असून, त्यात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पालकांना आता तीन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र सोपे बनले आहे. (वार्ताहर)सलग तीन वर्षांचे उत्पन्न...ज्या पालकांचे उत्पन्न सलग तीन वर्षे ६ लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्व पालकांना तीन वर्षांसाठी एकच प्रमाणपत्र मिळणार आहे. शिवाय, दोन वर्षांचे उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असेल तरी दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र वैध ठरणार आहे. या संकेतांकावर निर्णय...पालकांसह विद्यार्थ्यांना खेटे घालणे लागू नये, यासाठी २०१३०८१९१५३१०१७२२२ या संकेतांकावर सुधारित शासन निर्णय देण्यात आला आहे. पालक, विद्यार्थ्यांनी त्याचा वापर करावा.
‘नॉन-क्रिमीलेअर’ची वैधता आता तीन वर्षांसाठी !
By admin | Updated: June 10, 2014 00:52 IST