गजेंद्र देशमुख , जालनाजिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद या छोट्याशा खेड्यातील एका मुलीने आज मायानगरी मुंबईत स्वत:मधील कला व मेहनतीच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. २०१४ च्या आॅस्कर पुरस्कारातील पुढील प्रक्रियेतही धग या चित्रपटास स्थान मिळेल, असा विश्वास वैशालीने व्यक्त केला. वैशाली दाभाडे या सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने नाट्य तसेच चित्रपट सृष्टीत वेगळा ठसा उमटविला आहे. तिने अभिनय केलेल्या ‘धग’ या चित्रपटास जागतिक पातळीवर प्रसिद्ध अशा आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत...वैशालीने शालेय जीवनापासूनच नाटकांमध्ये अभिनय करत चित्रटपसृष्टी गाठली आहे. मी छोटीशी का होईना भूमिका साकारलेला चित्रपट आॅस्करसाठी नामांकन होत आहे, ही गोष्ट माझ्यासाठी तसेच जिल्ह्यासाठी मोठ्या आनंदाची तसेच अभिमानाची असल्याचे सांगितले. स्मशानातील म्हसनजोगींवर अधारीत धग हा चित्रपट असल्याचे वैशालीने सांगितले. गावातील कोणी व्यक्त मरण पावली तरच स्मशानभूमीत राहणाऱ्यांची चूल कशी पेटते, त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो या विषयावर हृदयस्पर्शी तसेच वास्तव परिस्थिती दाखविण्यात आली आहे. वैशालीचे शालेय शिक्षण भोकरदन तालुक्यात झाले. त्यानंतर औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर खरा चित्रपट व नाट्यसृष्टीतील स्ट्रगलला सुरुवात झाली. गॅदरिंंग, मुंबई, पुण्यात छोट्या नाटकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या. संत सिद्धेश्वर चित्रपटात सर्वप्रथम भूमिका साकारली. येथून चित्रपटासृष्टीत पदार्पण झाले. एका छोट्याशा खेडेगावातून सुरु झालेला संघर्ष अद्यापही सुरुच आहे. आजरोजी मित्र परिवार तसेच ओळखीचा जोरावर काहीअंशी स्थिरता येत असल्याचे वैशाली सांगते. धग चित्रपटात एका पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. उषा जाधव, उपेंद्र लिमये, नागेश भोसले आदी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे वैशालीने नमूद केले. आतापर्यंत धगसह राजवाडा, सिंघम रिटर्न, वात्सल्य, जाणिवा, ३१ आॅक्टोबर, फेकमफाक आदी चित्रपटात वैशालीने विविध भूमिका साकारल्या आहेत. व्हॅलेंटाईने हा आगामी चित्रपट येत आहे. यात लिड रोल असल्याचे तिने सांगितले. चिमणी पाखर, अशी ही धर्मकन्या या सह्याद्री वाहिनीवरील मालिकांमधूनही काम केले आहे. मुंबई ही मायानगरी आहे. चार ते पाच वर्षात अनेक अनुभव आले. मायानगरीत टिकून राहण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असल्याचे सांगून अद्यापही धडपड सुरु असल्याचे वैशालीची म्हणणे आहे. धग चित्रपटामुळे वेगळे वलय प्राप्त झाल्याचे ती सांगते. अनेक दिग्दर्शक आवर्जून विचारणा करतात. आज ना उद्या निश्चितच चित्रपटसृष्टी दखल घेईल, असा विश्वास वैशालीने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
आस्करच्या पुढील फेरीतही ‘धग’ बाजी मारेल
By admin | Updated: December 20, 2014 23:39 IST