महेबूबखाँ पठाण , शिरडशहापूरस्मशानभुमीत वास्तव्य करून अंत्यविधीवेळी प्रेतांचा सांभाळ करण्याची जबाबदारी शतकानुशतके पार पाडत असलेला मसणजोगी समाज आता पारंपारिक व्यवसाय सोडून मजुरीकडे वळत आहे. परतुं या समाजाची सामाजिक व राजकीय उपेक्षा अजूनही संपलेली नाही. एका हातात माणसाची कवटी व दुसऱ्या हातात मोठी घंटा. गळ्यात कंकाल निनादणारा मोठा शंख, देवी-देवतांचे छापे असलेला विचित्र प्रकारचा झबला, डोक्यावर तुर्रेबाज पागोेटे, मळवट भरलेले लालभडक कपाळ असे भयावह रूप धारण करून मसणजोगी दारोदारी भिक्षा मागत फिरत राहिला; परंतु समाजाने किंवा शासनाने या उपेक्षित समाजाची पाहिजे तशी दखल न घेतल्याने आता आपला पारंपारिक व्यवसाय सोडून सद्यस्थितीत सामाजिक प्रवाहात सामील झाला आहे. एकीकडे मसणजोग्याच्या रौद्ररूपाला पाहून लहान मुलेच काय, मोठी माणसेही घाबरत होती. स्मशानभूमीत राहणारा म्हणजे सामान्य माणसापेक्षा काहीतरी विाचत्र प्राणी, अशी मसणजोग्याबद्दल धारणा होती. राज्यात अगदी तुरळक असणारा हा समाज शिक्षण व सरकारी सोयी-सुविधांपासून दूर आहे. मुळचा आंधप्रदेशातील हा समाज मराठवाड्यात येऊन स्थायिक झाला.हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे या समाजाची १० ते १२ घरे आहेत. त्यांच्या कुटुंबातील काही जणच आता पारंपारिक झबल्याच्या वेशात दिसतात. स्मशानभुमीत रात्रभर जागल करूनही उदरनिर्वाहासाठी पुरेसे पैसे मिळत नसल्याने व भिक्षा मागणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता आधुनिक युगाच्या प्रवाहात सामील झाल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. शासनाकडून सवलती मिळण्यासाठी औंढा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. शासनाने या समाजाचा दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांमध्ये समावेश करून त्यांना सवलती व अन्न सुरक्षा योजनेचे धान्य देण्याची मागणी या समाजाने केली आहे. शासनाने मसणजोगी समाजाची होत असलेली हेळसांड लक्षात घेऊन त्यांच्या विकासासाठी पावले उचललावीत, अशीही या समाजातील लोकांची मागणी आहे.
मसणजोगी समाजाची उपेक्षा
By admin | Updated: July 25, 2014 00:31 IST